सांगली जिल्ह्यात ‘ माझे कुटुंब ‘ सर्वेक्षणाला ब्रेक
आटपाडी / प्रतिनिधी
राज्य शासनाने माझे कुटुंब माझी जबाबादारी’ हे अभियान सुरु केले असले तरी त्या अंतर्गत घरोघरी सर्व्हेक्षण करण्याच्या मोहिमेला पुर्णत: ब्रेक लागला आहे. अंगणवाडी सेविकांचे प्रलंबीत प्रश्न सोडविण्याची मागणी करत संघटनेने सर्वेक्षणात सहभागाला नकार दर्शविला असून राज्य शासनाने कोरोना युध्दात अहोरात्र कष्ट घेणाऱ्या अंगणवाडी सेविकांना तात्काळ दिलासा देण्याची मागणी जोर धरत आहे.
शासनाने १५ सप्टेंबरपासुन ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम सुरू केली आहे. त्यासाठी आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी घरोघरी जावून तपासणी करून सर्वे करणार आहेत. परंतु जिल्ह्यातील आशा स्वयंसेविकांनी या सर्वेसाठी असमर्थता दर्शवत आपले प्रश्न सोडविण्याची आग्रही मागणी केली आहे. आशा स्वयंसेविकांनी आत्तापर्यंत भरीव काम केले असुन त्यांच्या मागण्यांची तात्काळ सोडवणूक आवश्यक आहे. त्या अनुषंगाने आटपाही तालुक्यातील सर्वेला चालना देण्यासाठी प्र.तालुका आरोग्य अधिकारी डॉ.उमाकांत कदम यांनी आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक यांच्याशी चर्चा केली.
आटपाडी तालुक्यात ३० हजार ९२ कूटुंबे आहेत.१५ दिवस हे सर्वेक्षण करायचे आहे. त्यासाठी ६९ टीम नियुक्त करण्यात आल्या आहेत. तालुक्यात २३० आशा स्वयंसेविका आहेत. मंगळवारअखेर तालुक्यात १०२९ एकुण बाधितांपैकी ५९४ लोक कोरोनामुक्त झाले आहेत. ४३५ लोकांवर उपचार सुरू आहेत. पैकी ९९ लोक होम आसोलेशनमध्ये, कोरोना केअर सेंटरमध्ये १४६, ग्रामीण रूग्णालयातील सेंटरमध्ये २५, आटपाडी श्रीसेवा आयसीयूममध्ये ३२, सांगोला येथे ५ तर तासगाव येधे ३ लोक उपचार घेत आहेत.
माझे कुटुंब अभियानासाठी आशा स्वयंसेविकांची भुमिका आणि गरज महत्त्वाची
असुन त्यांचे मन वळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु संघटनात्मक पातळीवरील प्रश्न असल्याने राज्य शासनाने, लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे लक्ष न दिल्यास १५ दिवसाच्या अभियानाला विलंब होवुन कोरोनाच्या लढ्यात अथळे निर्माण होण्याची भिती आहे.


previous post