14 फेब्रुवारीपासून नवीन नियम : आता केवळ ‘स्व-निरीक्षण’
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात कोरोना संसर्ग कमी झाल्यामुळे आता केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय विमान प्रवासावरील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता 7 दिवस होम क्वारंटाईन होण्याची आवश्यकता भासणार नाही. तथापि, सरकारने भारतात आल्यावर 14 दिवसांचे स्व-निरीक्षण करण्याची शिफारस केली आहे. भारताबरोबरच जगभरात रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे निर्बंधांमध्ये सूट दिली जात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी सुधारित मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. येत्या 14 फेब्रुवारीपासून नवी नियमावली जारी होणार असल्याचे गुरुवारी सांगण्यात आले.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, प्रवास करण्यापूर्वी प्रवाशांनी 72 तास आधी कोरोना चाचणी निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र अपलोड करणे गरजेचे आहे. तसेच लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण केल्याचे प्रमाणपत्रही गरजेचे असणार आहे. प्रवाशांना भारताचा दौरा करण्यापूर्वी त्यांचा मागील 14 दिवसांचा प्रवास व भारतातील पूर्ण प्रवासाबद्दल माहिती देणे गरजेचे आहे.
नव्या नियमावलीनुसार, प्रवाशांना आता कोविडचे नमुने देऊन अहवाल येईपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार नाही. भारतात आल्यानंतर आठव्या दिवशी आरटी-पीसीआर चाचणी घेण्याची आणि तो रिपोर्ट अपलोड करण्याची आता गरज भासणार नाही. भारतात आगमन झाल्यावर, एकूण प्रवाशांपैकी फक्त 2 टक्के प्रवाशांचे नमुने घेतले जातील. यावेळी प्रवासी त्यांचे नमुने देऊन विमानतळावर जाऊ शकतात, असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले.
लक्षणे आढळल्यास विलगीकरण होणार
प्रवासादरम्यान जर कोणत्याही प्रवाशाला कोविड-19 ची लक्षणे आढळल्यास त्याला प्रोटोकॉलनुसार वेगळे केले जाईल. प्रवासादरम्यान सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे लागेल. विमानतळावर उपस्थित आरोग्य अधिकाऱयांकडून सर्व प्रवाशांचे थर्मल स्क्रिनिंग केले जाईल. तसेच ऑनलाईन भरलेला फॉर्म विमानतळ आरोग्य कर्मचाऱयांना दाखवावा लागेल. तपासणीदरम्यान लक्षणे आढळून आलेल्या प्रवाशांना ताबडतोब आरोग्य प्रोटोकॉलनुसार विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे.