मुंबई \ ऑनलाईन टीम
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबईतून जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली. मुंबई विमानतळावरुन छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला वंदन करुन ही यात्रा शिवाजी पार्कातील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर दाखल झाली. यावेळी नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला वंदन केलं. नारायण राणे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाणार की नाही याबाबत उत्सुकता होती. शिवसैनिकांनी नारायण राणेंना स्मारकाला भेट देऊ देणार नाही, असा पवित्रा घेतला होता. मात्र, आज नारायण राणेंनी शांततापूर्ण वातावरणात स्मारक स्थळी भेट दिली. यानंतर त्यांनी सावरकर स्मारकाला देखील भेट दिली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतींना उजाळा दिला.
यावेळी माध्यमांशी बोलताना नारायण राणे म्हणाले की, आज मी जन आशीर्वाद यात्रेनिमित्त बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या ठिकाणी नतमस्तक झालो. साहेब आज तुम्ही आशीर्वाद द्यायला हवे होता असेही राणे यावेळी म्हणाले. जे काही घडले, तुमच्यामुळे घडलो. आज बाळासाहेब असते तर आशीर्वाद दिले असते. आज बाळासाहेब नसले तरीही आशीर्वाद डोक्यावर आहेत. बाळासाहेब असते तर म्हणाले असते की नारायण अशीच प्रगती करत रहा. त्यामुळेच कोणत्याही व्यक्तीचे स्मारक असो विरोधाची भाषा नको, त्या भावनेचा आदर करायला हवा असेही राणे म्हणाले.
ज्यांना विरोधात बोलायचे आहे त्यांनी स्वतः बोलाव, उजव्या डाव्यांना बोलायला लावू नये. आम्ही त्यांनाही थेट उत्तर देऊ. कोणी आपल्यात मांजरीसारखे आडवे येऊ नये असेही राणे म्हणाले. येत्या महापालिका निवडणुकीत पापाचा ३२ वर्षांचा घडा फुटल्याशिवाय राहणार नाही असेही नारायण राणे म्हणाले.
मुंबई महापालिका जिंकण हीच जबाबदारी पक्षाने माझ्याकडे दिली आहे. काहीही झाल तरीही महापालिका जिंकणारच असेही ते म्हणाले. मुंबई महापालिकेसाठी देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर साऱ्यांकडेच जबाबदारी देण्यात आली आहे. माझ्याकडेही जबाबदारी देण्यात आली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. आता कोरोनाचे नियम सांगून उगाच उपदेशाची भाषा करू नये. फारच थोडे दिवस राहिलेत असेही राणे यांनी स्पष्ट केले. आमची शक्ती विरोधकांना माहितेय असेही राणे म्हणाले.


previous post