प्रतिनिधी / उंब्रज :
ठाकरे, पवार हिम्मत असेल तर मला आडवून दाखवा. भ्रष्टाचाऱ्यांच्या विरोधात माझी लढाई आहे, यासाठी शक्तीचे दैवत असणाऱ्या अंबामातेने मला शक्ती द्यावी, म्हणून प्रार्थना करण्यासाठी कोल्हापूरला चाललो आहे.
कोणत्याही परिस्थितीची परवा नाही. मात्र, घोटाळेबाजांना बंद करणे हे माझे कर्तव्य आहे. तसेच इज्जत वाचवण्यासाठी सरकारने माझ्यावरची बंदी उठवल्याचा घणाघात किरीट सोमय्या यांनी केला.
कोल्हापूरला जात असताना मंगळवारी सकाळी उंब्रज ता.कराड येथे किरीट सोमय्या यांचे आगमन झाल्यानंतर उंब्रज येथील भाजपा पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी बोलताना सोमय्या म्हणाले, अंबामातेचा आशीर्वाद घेण्यासाठी कोल्हापूरला निघालो आहे. घोटाळेबाजांना बंद करण्यासाठी मी जो लढा उभारला आहे, त्यासाठी मला शक्ती द्यावी, ही प्रार्थना करण्यासाठी मी चाललो आहे. सरकारच्या बंदीला कोणीही भीक घालत नाही. मी तर त्यांना चॅलेंज केले आहे की ठाकरे पवार यांनी हिंमत असेल तर मला अडवून दाखवावे. हे त्यांच्या लक्षात आले आहे. जनता किरीट सोमय्याच्या मागे आहे. काल रात्री जिल्हाधिकाऱ्यांनी परिपत्रक काढले. या परिस्थितीची परवाना नाही. घोटाळेबाजांना बंद करणे हे माझे कर्तव्य आहे. असे सोमय्या यांनी सांगितले.दरम्यान भारतीय जनता पार्टी कराड उत्तरच्या वतीने उंब्रज येथे घोषणाबाजी करत सोमय्या
यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास, कराड उत्तर तालुकाध्यक्ष महेशकुमार जाधव,जिल्हा सरचिटणीस महेंद्रकुमार डुबल आदी उपस्थित होते.