मुंबई \ ऑनलाईन टीम
कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहता राज्यात ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंधांची घोषणा करण्यात आली आहे. मात्र परिस्थिती अद्यापही नियंत्रणात आलेली दिसत नाही. दैनंदिन रुग्णसंख्या वाढत असून राज्य सरकारची चिंता वाढली आहे. दरम्यान राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागण्याचे संकेत दिले आहेत. कडक लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री दोन दिवसात निर्णय घेतील. गरज पडली तर कालावधी वाढू शकेल, असं मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
माध्यमांशी संवाद साधतान विजय वडेट्टीवार म्हणाले की, लॉकडाऊन काळात लोकांना मदत करण्याबाबत आढावा घेतला. पुढच्या आठवड्यात सगळ्यांना मदत मिळाली पाहिजे. नाभिक समाजाला मदत कशी करायची यावर विचार सुरु आहे. माहिती गोळा करून कशी मदत करायची यावर चर्चा सुरु आहे. अद्याप केंद्र सरकारने एसडीआरएफमध्ये कोविडसाठी पैसे दिलेले नाहीत. गेल्यावेळी १२०० कोटी रुपये दिले होते. मागच्या वेळी ३ एप्रिलला पैसे आले होते, पण आज १९ एप्रिल असून अद्यापही पैसे आलेले नाहीत. हे टीका म्हणून नाही, पण उशीर झाला आहे. यावर्षी त्यांच्याकडून १६०० कोटी अपेक्षित आहेत.
संचारबंदीचा फायदा सध्या पाहिजे त्या प्रमाणात झालेला दिसत नाही. आपण लॉकडाऊन केलेला नाही. अनेक व्यापाऱ्यांचा लॉकडाऊन ला विरोध होता. पण आज व्यापारी किंवा जीवनाश्यक वस्तूंची तसंच इतर लहान दुकानं असणारेही लॉकडाऊन १०० टक्के करा अशी मागणी करत आहे. अनेक जिल्ह्यांमध्येही लोक मागणी करत असून आम्ही मुख्यमंत्र्यांना यासंबंधी माहिती दिली आहे. दोन दिवसांत कडक लॉकडाऊनसंबंधी निर्णय अपेक्षित आहे. मुख्यमंत्री इतरांशी चर्चा करुन तो निर्णय घेतील,असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे.
दिल्लीने कडक लॉकडाऊन केला असून त्याची माहिती आम्ही घेत आहोत. लॉकडाऊन कसा आहे, त्यांची नियमावली काय आहे यावर चर्चा करण्याचा निर्णय झाला आहे,” अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी यावेळी दिली.

