कोकण रेल्वे प्रवाशी सेवा संघाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
प्रतिनिधी/खेड
कोरोनाच्या लॉकडाऊननंतर कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या नियमित रेल्वेगाड्यांसह जलद रेल्वेगाड्यांना ब्रेक लागला आहे. सद्यस्थितीत तुतारी कोविड विशेष गाडी सुरु करण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर नियमित रेल्वेगाड्यांसह अन्य जलद गाड्याही सुरू करण्याची मागणी कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाची झळ साऱ्यांनाच बसत असून जनजीवनच विस्कळीत झाले आहे. या कठीण परिस्थितीत महाराष्ट्रात भारतीय रेल्वेतील मध्य व पूर्व रेल्वेसेवा काही प्रमाणात सुरू करण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या संकटामुळे ओढवलेली परिस्थिती पूर्वपदावर येण्यास लागणारा कालावधी अनिश्चितच आहे. कोकण मार्गावर धावणाऱ्या रेल्वेगाड्यांना ब्रेक लागल्याने मुंबईहून कोकणात व कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना ये-जा करण्यासाठी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
यापार्श्वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या नियमित गाड्यांसह तुतारी एक्सप्रेस, जनशताब्दी एक्सप्रेस, मांडवी एक्सप्रेस, कोकणकन्या एक्सप्रेस या जलद गाड्या सुरू केल्यास कोकणवासियांची चांगली होणार आहे. शासनाच्या सामाजिक अंतर व नियमावलीनुसार प्रवास राण्याची हमी देण्यात येत आहे. या मागणीचा गांभिर्याने विचार करावा, असेही निवेदनात नमूद केले आहे. याप्रसंगी कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाचे अध्यक्षा सुजित लोंढे, सचिव दर्शन कासले, प्रमुख राजू कांबळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

