अंजुमन-ए-इस्लाम संस्थेची अविरत धडपड : रुग्णांना वेळेत उपचार पुरविण्यासाठी पुढाकार : सर्वस्तरातून कार्याचे होतेय कौतुक
अक्षता नाईक / बेळगाव
कोरोनाच्या विळख्यातून समाजाला बाहेर काढण्यासाठी समाजसेवकांची गरज आहे. आज समाजात सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून अनेक समाजसेवक, संस्था कार्यरत झाल्या आहेत. समाजातील पीडित घटकाला मार्गदर्शनाअभावी समस्यांमधून बाहेर निघण्यासाठी मार्ग दिसत नाही. अशावेळी रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना मदत, मार्गदर्शन तसेच समस्यांवर मात करण्यासाठी आत्मिक बळ देण्याचे कार्य सध्या अंजुमन-ए-इस्लाम या संस्थेच्या माध्यमातून सुरू आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून ते आजतागायत कोरोनाच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी ही संस्था तत्पर आहे. तसेच तळागाळातील लोकांमध्ये आशेचा किरण दाखविण्याचे कार्य संस्थेमार्फत केले जात असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे सर्वस्तरातून कौतुकही केले जात आहे.


गेल्या 14 ते 15 महिन्यांपासून आपण सर्वजण या कोरोनाच्या विळख्यात अडकलो आहोत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत लस नसतानादेखील सर्व ती सुरक्षा बाळगून तसेच शासनाच्या नियमांचे पालन करत आपण सुरक्षित राहिलो. त्या काळात अनेकांचा उपचाराअभावी मृत्यू झाला तर काहींना ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने प्राणाला मुकावे लागले. ही परिस्थिती नियंत्रणात येते ना येते तोच कोरोनाच्या दुसऱया लाटेने हाहाकार माजविला आहे. लस घेऊनसुद्धा अनेक नागरिकांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे सर्वच कुटुंबीयांना पुन्हा एकदा कोरोना महामारीच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. सध्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने हॉस्पिटलमध्ये बेडची कमतरता भासत आहे. याशिवाय ऑक्सिजनचा तुटवडाही निर्माण झाल्याने रुग्णालयांच्या असुविधांचा फटका रुग्णांना बसत आहे. उपचाराअभावी व ऑक्सिजनच्या तुटवडय़ामुळे रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. या समस्येतून रुग्णांना बाहेर काढण्यासाठी व वेळेवर उपचार मिळण्यासाठी अंजुमन संस्थेने पुढाकार घेऊन अविरत मदत करण्यास सुरुवात केली आहे. रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासह घरोघरीदेखील आपली सेवा देत आहे.
अंत्यसंस्कार करण्यासाठीही टीम कार्यरत
अंजुमन संस्थेतर्फे रुग्णांवर उपचार करण्यास काही डॉक्टरांचा संघ नेमण्यात आला आहे. तर ऑक्सिजन पुरवठय़ासाठी एक वेगळी टीमही तैनात करण्यात आली आहे. याशिवाय मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठीही टीम कार्यरत आहे. गेल्या वर्षभरापासून दररोज या संस्थेने जवळपास 850 ऑक्सिजन सिलिंडर रुग्णांपर्यंत पोहोचवले आहेत. याशिवाय फक्त गेल्या महिन्याभरात 400 ऑक्सिजन सिलिंडर पोहोचविण्यात आले आहेत. त्यांचे हे कार्य फक्त बेळगावपुरते मर्यादित न राहता संकेश्वर, रायबाग, चिकोडी, हिरेबागेवाडी, बैलहोंगल, अथणी, खानापूर, गडहिंग्लज, शिनोळी, चंदगड या ठिकाणीही मदत देऊ केली आहे. जात, धर्म, पंथ सर्व काही विसरून फक्त माणुसकीच्या नात्याने व जनसेवा करण्याच्या हेतूने ही संस्था अविरतपणे कोणताही स्वार्थ न ठेवता कार्य करताना दिसून येत आहे. त्यांचे हे कार्य वाखाणण्याजोगे आहे. तसेच कोरोना झालेल्या मयतांवर अंत्यविधी करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. या वर्षभरात 20 ते 25 मयतांवर अंत्यसंस्कार केले आहेत. वडगाव, हुदली, बेळगाव शहर, ग्रामीण भाग याशिवाय अनेक परिसरातील हिंदू आणि ख्रिश्चन धर्मातील व्यक्तींवर त्या-त्या धर्मातील पद्धतीने अंत्यविधी केले आहेत. या कार्याचे कौतुक सर्वत्र केले जात आहे.