मुंबई \ ऑनलाईन टीम
भाजप सोडून राष्ट्रवादीमध्ये दाखल झालेल्या एकनाथ खडसे यांना ईडीची नोटीस आली असून भोसरीतील जमीन गैरव्यवहार प्रकरणी त्यांची देखील चौकशी सुरू आहे. त्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीत सन्मानाने प्रवेश दिल्याने चिडून जाऊन भाजप केंद्रीय एजन्सीचा गैरवापर करत चुकीच्या पध्दतीने खडसेंना अडकवत असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे.
जयंत पाटील म्हणाले की, खडसे यांच्यावर ज्या विषयावर कारवाई सुरू आहे त्यात अद्याप तथ्य आढळलेले नाही. किंवा कोणतेही आरोप सिद्ध झालेले नाही. एक जागा त्यांनी रितसर घेतली त्याबाबत निर्णय झालेला आहे. चौकशी समितीलाही त्यात काही चूक आढळली नाही. पण त्यामध्ये कुभांड रचून या सर्व एजन्सीमार्फत राजकीयदृष्टया अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे, असा दावा त्यांनी केला.
भाजपचा एकनाथ खडसे या ओबीसी नेत्यावर फार जुना राग आहे. एकनाथ खडसे यांना भाजपमध्ये फार वाढू दिले गेले नाही. ओबीसी नेतृत्वाला बाजुला करण्यात आले असा आरोपही जयंत पाटील यांनी यावेळी केला आहे.

