ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी अशी मागणी लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष आणि खासदार चिराग पासवान यांनी केली आहे. उत्तर भारतीयांना महाराष्ट्रात लक्ष केलं जात आहे, कंगनाचं ऑफिस तोडले, माजी नौदल अधिकाऱ्यांना मारहाण करण्यात आली आणि आता मारहाण करणाऱ्यांना ताबडतोब जामिनही मिळाला. त्यामुळे राज्यातील जनतेला सरकारचाच भय नसेल तर, राष्ट्रपती शासनाशिवाय दुसरा पर्याय नाही, अशी स्पष्ट भूमिका पासवान यांनी मांडली.


त्यांच्या या मागणीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत एक पत्र लिहीत थेट शब्दांत उत्तर देत बिहारमध्ये अशी मागणी का केली नाही असा प्रश्न विचारत निशाणा साधला आहे.
ते आपल्या ट्विटमध्ये पासवान यांना म्हणाले की, चिरागजी आपण महाराष्ट्राच्या कायदा आणि सुव्यवस्थेबाबत तुम्ही चिंतातूर आहात आणि राज्यात राष्ट्रपती राजवटीचीही मागणी केली असे ऐकले. आता तुम्हाला कायदा आणि सुव्यवस्थेची इतकीच चिंता आहे, तर मग बिहारमध्येही तुम्ही अशी मागणी का केली नाही? जेव्हा मुजफ्फरपूर निवारागृहामध्ये मुलींचं लैंगिक शोषण करण्यात आले होते. अशा घटना इतरही जिल्ह्यांमध्ये घडल्याचे तुम्ही म्हटले होते तेव्हा मात्र आपण नितीश कुमार यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली नाही’, असे लिहित बिहारची राजधानी पाटणा ही देशातील खुनांच्या घटनांमध्ये 19 शहरांमध्ये पहिल्या स्थानावर असल्याची धक्कादायक बाब त्यांनी अधोरेखित केली.