मुंबई \ ऑनलाईन टीम
मुंबईत कोरोना रुग्णसंख्येचा आलेख खाली येताना दिसत आहे. त्यामुळे मुंबईत लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. यानंतर शहरात येणाऱ्या वाशी, दहिसर, मुलुंड या मुख्य प्रवेशांच्या ठिकाणी वाहनांची तोबा गर्दी पाहायला मिळाली. नियमांमध्ये शिथिलता मिळालेली असली तरीही कोरोना संपलेला नाही, ही बाब मात्र मुंबईकर सपशेल विसरुन गेल्याचं चित्र दिसून आलं. त्यामुळे मुंबईकर अशीच गर्दी करत राहिले तर कठोर निर्णय़ घ्यावा लागेल असा थेट इशारा शहराच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे.
किशोरी पेडणेकर माध्यमांशी बोलताना म्हणाल्या की, नागरिकांनी आजही गोष्टी समजून घेण्याची आवश्यकता आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या इशाऱ्याचं नागरिकांनी पालन करावं. या परिस्थितीमध्ये नागरिकांचं सहकार्य मिळणं अपेक्षित असून, तसं होत नसल्यास कठोर निर्णय घ्यावा लागेल. सध्याची कोरोना परिस्थिती आणि त्यासंदर्भात खुद्द आरोग्यमंत्री राजेश टोपे, राज्य शासन आढावा घेत आहेत त्यामुळे निश्चितच यावर मार्ग काढण्यात येईल, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील काल एका कार्यक्रमात मुंबईतील गर्दीवरून नाराजी व्यक्त केली होती. तसेच मुख्यमंत्र्यांनी मुंबईकर अशीच गर्दी करत राहिले तर निर्बंध कडक करावे लागतील असा इशारा देखील दिला होता.


previous post
next post