- राहुल गांधींचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
संपूर्ण देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. रुग्णालयात बेड्स नाहीत, ऑक्सिजन नाही अशी गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. तसेच कोरोना मोठ्या प्रमाणात लसींचा तुटवडा जाणवत आहे. दुसरीकडे, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक राज्यांनी मोफत लसीकरणाचा निर्णय घेतला आहे. त्यातच आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. संपूर्ण देशात कोरोनाची लस मोफत मिळाली पाहीजे असे ट्विट त्यांनी केले आहे.


ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, चर्चा खूप झाली. आता देशातील प्रत्येक नागरिकाला मोफत लस मिळाली पाहीजे. बस एवढंच..भारताला भाजपाच्या सिस्टमचा विक्टिम बनवू नका, अशी टीका त्यांनी देखील त्यांनी यावेळी केली आहे.
दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांना 20 एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाली आहे. राहुल गांधी यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली होती. सौम्य लक्षणं आढळल्यानंतर चाचणी केली असता कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती त्यांनी दिली. तत्पूर्वी राहुल गांधी यांनी करोनाचा कहर वाढत असल्याने पश्चिम बंगालमधील आपल्या सर्व सभा रद्द करत असल्याची घोषणा केली होती.
यापूर्वीही राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर सिस्टम फेल झाल्याप्रकरणी जनहिताची चर्चा करणे गरजेचे आहे, असे म्हणत टीका केली होती.