पंचगंगा घाटावर कार्यकर्त्याने आंदोलकास पकडले : आश्वासनानंतर उचगाव-वळीवडेतील आंदोलन स्थगित
वार्ताहर / उचगाव
उचगाव-वळीवडे हद्दीतून जाणाऱ्या ओढ्यावरील अतिक्रमणप्रश्नी करवीरच्या तहसीलदार शितल मुळे-भामरे किंवा नायब तहसीलदारांची बैठकीसाठी प्रतीक्षा करत असतानाच जलसमाधीचा इशारा देणारे आंदोलक राजू कांबळे शुक्रवारी अचानक गायब झाल्याने पोलिसांची भंबेरी उडाली. त्यांची रात्री शोधाशोध सुरू झाली. जलसमाधी घेण्यासाठी निगडेवाडी येथील पंचगंगा नदीच्या घाटावर गेलेल्या राजू कांबळे यांना विळखा घालून वाहतूक सेनेच्या रामभाऊ साळोखे यांनी पकडले व सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांना बेमुदत धरणे आंदोलनाच्या ठिकाणी आणले. आंदोलक मिळून येताच पोलीस व अन्य आंदोलकांनी सुटकेचा एकच निश्वास टाकला.
या अतिक्रमणप्रश्नी २१ जूनपासून दलित महासंघाच्या वतीने उचगाव-वळीवडे सीमेवरील कुट्ट्या मंदिर परिसरात बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन सुरू असतानाच शनिवारी जलसमाधी घेण्याचा इशारा दलित महासंघाचे शहराध्यक्ष राजू कांबळे यांनी दिला. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी गटविकास अधिकारी जयंत उगले प्रशासनाच्या वतीने चर्चेसाठी आंदोलनस्थळी आले. आंदोलक राजू कांबळे यांच्याशी चर्चा केली. पण करवीरच्या तहसीलदारांनीच येथे आले पाहिजे असा आग्रह कांबळे यांनी धरला. अखेर चर्चेसाठी नायब तहसीलदार विपिन लोकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. लोकरे यांची आंदोलनस्थळी सर्वजण प्रतिक्षा करु लागले. पण या सर्वांना चकवा देत राजू कांबळे तिथून गायब झाले.
दरम्यान, रात्री उशिरा लोकरे घटनास्थळी आले. पण आंदोलक कांबळे गायब झाल्याने पोलिसांसह सर्वानी त्यांची शोधाशोध सुरू केली. अखेर वाहतूक सेनेचे रामभाऊ साळोखे यांनी त्यांना निगडेवाडी येथील पंचगंगा नदीघाटावर विळखा घालून ताब्यात घेतले व आंदोलनस्थळी आणले. नायब तहसीलदार लोकरे यांच्याशी राजू कांबळे यांनी चर्चा केली. तहसीलदारांचे कारवाईबाबतचे पत्र कांबळे यांना देण्यात आले. याप्रश्नी सर्व संबंधित घटकांची तहसीलदारांसमवेत बैठक घेण्याचे ठरल्यानंतर कांबळे यांनी आंदोलन स्थगित केल्याचे जाहीर केले.

