ऑनलाईन टीम / जळगाव :
जळगावातील यावल-चोपडा रस्त्यावर ट्रक उलटून भीषण अपघात झाला. खड्डे चुकवण्याच्या नादात चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि ट्रक पलटी झाला. या अपघातात 15 मजूर जागीच ठार झाले. तर दोन जणांची प्रकृती चिंताजनक असून, जखमींवर जवळील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री एक वाजण्याच्या सुमारास पपयांचा ट्रक पलटी झाल्यामुळे हा भीषण अपघात झाला. यावल-चोपडा रस्त्यावर असणाऱ्या एका वळणावर ट्रक चालकाचा ताबा सुटला आणि ट्रक पलटी झाला. पपई घेऊन हा ट्रक बाजारपेठेकडे निघाला होता. ट्रकमध्ये भरलेल्या पपयावर मजूर बसले होते. रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे होते. हे खड्डे चकवण्याच्या नादात चालकाचा वाहणावरील ताबा सुटल्यामुळे ट्रक पलटी झाला असल्याचे सांगितले आहे.
या दुर्देवी अपघाताची माहिती मिळताच जळगाव आणि यावल येथील पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. त्यानंतर मदतकार्याला वेग आला. पहिल्यांदा पलटी झालेला ट्रक क्रेनच्या साहाय्याने सरळ करण्यात आला. त्यानंतर मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.


दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेत मृत झालेल्या व्यक्तींबद्दल शोक व्यक्त केला तर जखमींनी लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना केली.