मुंबई \ ऑनलाईन टीम
नाशिकमध्ये गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या पाच कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. नवश्या गणपती मंदिरात कोरोना नियम मोडत आरती केल्याप्रकरणी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या सोबत आलेल्या पाच कार्यकर्त्यांसह विश्वस्तांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. दरम्यान भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी याप्रकाराबाबत नाराजी व्यक्त करत ठाकरे सरकारमधील मंत्र्यांना वेगळा न्याय का , असा सवाल उपस्थित केला आहे.
याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. ठाकरे सरकारमधील मंत्र्यांना वेगळा आणि सर्व सामान्य नागरिकांना वेगळा कायदा असतो का ? असा प्रश्न तुषार भोसले यांनी केला आहे. तसेच जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा यासाठी पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहे. गुन्हा दाखल न केल्यास धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही आचार्य तुशार भोसले यांनी दिला आहे.
जितेंद्र आव्हाड यांना वगळून अन्य पाच जणांविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये योगेश नामदेव दराडे , स्वप्नील प्रभाकर चिंचोले , विक्रांत उल्हास सांगळे, संतोष पांडुरंग काकडे, आनंद बाळिवा घुगे या पाच कार्यकत्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यांवर मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग, भादंवि कलम १८८६, २६९ नुसार गुन्हा दाखल झाला आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून मंदिरांसह सर्व धर्मीयांची प्रार्थनास्थळे बंद ठेवली जात आहेत. असं असताना दुसरीकडे राज्याच्या मंत्र्यांनीच चक्क मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करत आरती केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.


previous post