Tarun Bharat

ढगाळ वातावरणामुळे सुगी हंगामात व्यत्यय

खानापूर तालुक्मयात स्थिती,शेतकरीवर्ग चिंताग्रस्त : मजुरांची टंचाई निर्माण होण्याची शक्यता

वार्ताहर / खानापूर

खानापूर तालुक्यात सुगीच्या हंगामाला जोर आला असतानाच अचानकपणे आकाशात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. सध्या भात कापणीच्या हंगामाला जोर आला आहे. मागील दोन दिवस थंडीमुळे गारवा निर्माण झाला असतानाच शुक्रवारी सकाळपासून आकाशात ढगाळ वातावरण निर्माण जाल्याने भात कापणीत व्यत्यय आला आहे.

आठवडय़ाभराच्या विश्रांतीमुळे भात कापणीला जोर आल्याने माळवट व मध्यम शेतवडीतील पिकांच्या कापणीला जोर आला आहे. पाणथळ जमिनीतील भातपिके व उशिरा रोपलागवड केलेली पिके कापणीच्या उंबरठय़ावर आहेत. उत्तमप्रकारे पोसलेली पिके जमिनदोस्त झाल्याने लवकरात लवकर कापणी करुन मळणीच्या प्रयत्नात शेतकरी आहे. परंतु पुन्हा वातावरणात कमालीचा बदल होवून पाऊस    सदृश वातावरण निर्माण झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे भात कापण्या पुन्हा खोळंबण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

खानापूर तालुक्यातील शेतजमीन वाळुमय असल्याने येथे भात पिकावर मोठय़ा प्रमाणात भर दिला जातो. मात्र येथील बळीराजा आजही वडीलोपार्जित पद्धतीने शेती कसत आला आहे. इंटाण, मटाळगा, करीकल, दोडगा आदी भात पिकावरच येथील शेतकरी समाधान मानतो. मात्र चंदगड-गडहिंग्लज तालुक्याच्या धर्तीवर खानापुरातील जमिनीत भातपीक घेतल्यास उत्पन्नात दुप्पट वाढ होते. तसेच संकरित भात पिकामुळे त्यांच्या उत्पन्नात दुपटीने वाढ झाल्याचे काही शेतकऱयांनी बोलताना सांगितले.

हलशी-नंदगड परिसरात बळीराजा आजही इंटाण, मटाळगा आदी पारंपरिक भात पिके घेताना दिसतो. मात्र दरवर्षी त्याच-त्याच बियाणांमुळे भात पिकाच्या उत्पन्नात म्हणावी तशी वाढ होत नाही. शिवाय आज औतांची संख्या कमी झाल्याने बरेच शेतकरी पेरणीऐवजी भात लागवडीवर भर देत आहेत. मात्र पेरणी हंगामात पारंपरिक बियाणांचा तण लागवडीसाठी टाकल्यानंतर तब्बल दीड-दोन महिन्यानंतर रोपांची लागवड करतात. यामुळे पिके जोमाने न उगवता पावसामुळे रोगीष्ट बनतात. गेल्या दोन दिवसात ढगाळ वातावरणामुळे शेतकऱयात धास्ती निर्माण झाली आहे. तालुक्यातील करंबळ, चापगाव, हलशी, नंदगड, हलगा, रूमेवाडी, इदलहोंड, गर्लगुंजी भागात भात कापणीला आले आहे. मागील आठवडय़ात झालेल्या पावसामुळे उत्तम कोठेरी भात पिके जमीनदोस्त झाली आहेत. आता त्या भाताची वेळेत कापणी झाली तर ही पिके लाभदायक ठरतील, अन्यथा पुन्हा पावसाने सुरुवात केल्यास या वषीचे संपूर्ण भातपीक नुकसानीत जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

तालुक्मयात 80 टक्के भात पीक

खानापूर तालुक्मयात 80 टक्के भात पीक उत्पादित केले जाते. परंतु यावषी झालेल्या जोराच्या पावसामुळे सखल भागातील भात पिके वाहून गेली आहेत. तर जमिनीचे नुकसान झाले आहे. तरीदेखील शेतकऱयांनी आपली भात पिके पोसण्यासाठी प्रयत्न करून त्यांची जोपासना केली आहे. परंतु पुन्हा सुरू असलेल्या वादळी तडाख्याने या पिकांना धोका निर्माण झाला आहे. आता भात पिके पूर्णत: कापणीला आली आहेत. त्यासाठी आता चांगल्या वातावरणाची गरज असून शेतकरी आभाळाकडे टक लावून आहेत. आता एकाच वेळी भात कापणी होणार असल्याने मजुरांचा तुटवडा वाढणार आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागांमध्ये ‘एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ या उक्तीप्रमाणे एकमेकांच्या शेतातील भात कापण्यासाठी मदतीचा हात पुढे करून सुगीला जोर वाढणार आहे. अलीकडे आधुनिक शेती पद्धतीमध्ये मशीनद्वारे भात कापणीसाठी प्रोत्साहन दिले जाते. परंतु यावषी भात पिकात अधिकच चिखल असल्याने या कामालाही अडचण निर्माण होणार आहे. यासाठी आता पूर्णतः पावसाने विसावा घेऊन जमीन सुकण्यासाठी साथ दिली तरच खऱया अर्थाने सुगी आनंददायी ठरणार आहे.

Related Stories

छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श सर्वांनी घेणे गरजेचे

Amit Kulkarni

निराश्रीत केंद्रातील वृद्धाचा मृत्यू

Patil_p

सार्वजनिक स्थळी धूम्रपान करणाऱयांवर कारवाईची सूचना

Patil_p

मराठा इन्फंट्रीतर्फे शरकत दिन साजरा

Patil_p

जीएसएस कॉलेजमध्ये विज्ञान उत्सवाचे आयोजन

Amit Kulkarni

बियाणांच्या खरेदीवेळी काळजी घेणे गरजेचे

Amit Kulkarni
error: Content is protected !!