विलवडे येथील आढावा बैठकीत आमदार केसरकर यांचे आदेश
ओटवणे / प्रतिनिधी:
तेरेखोल नदीच्या महापुरामुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना शासनाकडून जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्यासाठी आपण प्रयत्नशील असून याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेही लक्ष वेधण्यात आले आहे. तसेच नुकसान झालेल्या घरे, दुकाने, शेत मांगर, शेती बागायती यांचे नुकसानीचे योग्य पंचनामे करण्याच्या सूचना माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार दिपक केसरकर यांनी महसूल व कृषी प्रशासनाला दिल्या.
तेरेखोल नदीच्या महापुरामुळे ओटवणे, सरमळे, विलवडे, वाफोली या गावात कोट्यावधींचे नुकसान झाले. याबाबत विलवडे ग्रामपंचायत येथे घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत श्री केसरकर बोलत होते. यावेळी गरीब शेतकरी व दुकानदारांचे १०० टक्के नुकसानभरपाईचे पंचनामे करण्याच्या सूचना श्री केसरकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच तेरेखोल नदीत पात्रात प्रचंड प्रमाणात गाळ असल्यामुळेच पुराचे भयानकता वाढली त्यामुळे पावसाळ्यानंतर नदीतील गाळ उपसण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना महसूल प्रशासनाला दिल्या. यावेळी तहसीलदार राजाराम म्हात्रे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी, विलवडे सरपंच रावजी दळवी, ओटवणे सरपंच उत्कर्षा गावकर, माजी उपसभापती विनायक दळवी, कृष्णा सावंत, सुशांत पांगम, कृषि अधिकारी श्री अडसूळ, विस्तार अधिकारी सुजित येरवलकर, बाळकृष्ण दळवी, पांडुरंग कांबळे, कृषि सहायक वसकर, तलाठी भक्ति सावंत, ग्रामसेविका प्रीती देसाई, मंथन गवस, साई काणेकर, सोनू दळवी, आनंद दळवी, प्रकाश पनासे, उमेश गावकर आदी उपस्थित होते.