परीक्षेचे हॉल तिकीट हाती आलेय, परीक्षेला अवघे तीन दिवस बाकी असताना परीक्षा रद्दचा निर्णय
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलली हे आम्ही समजू शकतो. यापुर्वी रेल्वे भरती, आरोग्य भरती यासह अन्य परीक्षा झाल्या. राज्यकीय कार्यक्रम, निवडणुका, अधिवेशन झाले. तेंव्हा कोरोना होत नाही, मग राज्य सेवा पूर्व परीक्षेलाच कोरोना कसा होतो, असा सवाल करीत नियोजित वेळेत म्हणजेच 14 मार्च रोजी परीक्षा घ्या, अन्यथा खुर्चा खाली करा, अशा तीव्र भावना व्यक्त करीत, सरकारच्या निषेधार्त घोषणाबाजी करीत सायबर चौकात परीक्षार्थींनी रास्ता रोको आंदोलन केले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा अवघ्या तीन दिवसांवर आली असताना परीक्षा रद्द केल्याची घोषणा लोकसेवा आयोगाकडून करण्यात आली. ही गोष्ट विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी असल्याने परीक्षार्थ्यांचा संताप अनावर झाला. शिवाजी विद्यापीठ, प्री-आयएस सेंटर, सायबर चौक येथील वाचनालयातून थेट रस्त्यावर उतरत सरकारच्या विरोधात विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केली. तसेच तब्बल दोन तास सायबर चौकात रास्ता रोको आंदोलन केले.


पोलीसांनी हस्तक्षेप करीत विद्यार्थ्यांना रस्त्यातून बाजूला केले. तरीही विद्यार्थ्यांच्या भावना तीव्रच होत्या. आम्ही गेल्या तीन, चार वर्षापासून अभ्यास करीत आहोत. सरकार वारंवार परीक्षा पुढे ढकलत आहे, त्यामुळे आमचा संयम संपला असून सरकारने ही परीक्षा ठरलेल्या वेळेत घेतली नाही, तर निवडणुकीत त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा ईशाराही परीक्षार्थींनी सरकारला दिला. तसेच ग्रामपंचायत निवडणुका, राजकीय कार्यक्रम, लग्न समारंभ व्यवस्थित होतात. मग परीक्षाच का होवू शकत नाही, असा सवालही सरकारला परीक्षार्थींनी विचारला.
एमपीएससीचा अभ्यास करण्याची मानसिकता संपली
अनंत अडचणींचा सामना करीत आई, वडील आपल्या मुलांना शहरात अभ्यासासाठी पाठवतात. निवास, भोजन व्यवस्थेबरोबर कोचिंग क्लासेससाठी खर्च करतात. अशावेळी तीन दिवस अगोदर परीक्षा रद्द होत असेल तर आमची मानसिकता सांभाळायची, याचे उत्तर सरकारने द्यावे. -निलम पाटील (विद्यार्थीनी, सांगली)
सरकार आणि लोकसेवा आयोगात ताळमेळ नाही
सरकार आयोगाला की आयोग सरकारला चालवत आहे हे कळत नाही. आयोग स्वायत्त नसल्याची प्रचिती आज आली. अधिवेशन संपल्यावर परीक्षा रद्दचा निर्णय का? हा निर्णय परीक्षार्थींवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा सरकारवर रोष आहे. -सुहास पाटील (कोल्हापूर)
पोलीसांकरवी आंदोलन थांबवले
कोल्हापूर, पुणे, मुंबई, दिल्लीत जावून विद्यार्थी एमपीएससीचा अभ्यास करतात. कितीवेळा पेपर पुढे ढकलायचा याला मर्यादा नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा राग अनावर झाल्याने विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. वय वाढवून देवू असे सरकार सांगतेय पण विद्यार्थ्यांच्या वाढणाऱया वयाचा विचार सरकार कधी करणार. सरकारने पोलिसांकरवी जाणून-बुजून आंदोलन थांबवले. – भालचंद्र मोठे (सांगली)
अ.भा.नौजवान सभा रस्तयावर
एमपीएससीची परीक्षा रद्द झाल्याचे समजताच यूथ फेडरेशनच्या कार्यकर्ते, व परीक्षार्थींनी मोठÎा संख्येने एकत्र येत गिरीश फोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली बिंदू चौकात आंदोलन केले. सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत निषेध व्यक्त करण्यात आला.