ऑनलाईन टीम / जलपाईगुडी :
पश्चिम बंगालमध्ये धुक्यामुळे मंगळवारी रात्री भीषण रस्ता अपघात झाला. जलपाईगुडी जिल्ह्यातील धुपगुडी येथे झालेल्या या अपघातात 13 जणांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


उत्तर भारतात सध्या थंडीची लाट आली सुरु असून त्याचे परिणाम देशाच्या इतर भागातही पहायला मिळत आहेत. तापमानात कमालीची घट झाल्याने पश्चिम बंगालमधील काही भागात पहाटेच्या सुमारास दाट धुके पहायला मिळत आहेत. यामुळे महामार्गांवरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दाट धुक्यामुळे येथे जलपाईगुडी जिल्ह्यात काल रात्री भीषण रस्ता अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री उशिराने अधिक काळोख असल्याने एका डंपरने अनेक गाड्यांना टक्कर दिली. यामध्ये डंपर देखील उलटा झाला. या अपघातात 13 जणांना आपला जीव गमवावा लागला तर अनेक जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. हे सर्व लोक एका विवाह सोहळ्यात सहभागी होऊन आपल्या घरी परतत होते. या घटनेची माहिती मिळताच पोलीस लगेचच घटनास्थळी पोहचले. दरम्यान, सर्व जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.