आजच्या जगाला विकसित करणारा एकमेव सक्षम घटक म्हणून तरुणाईकडे पाहिले जाते. सामाजिक उत्थानाची जबाबदारी असलेल्या या तरुणांपुढे काय आदर्श व आव्हाने आहेत? हा प्रश्न एखाद्या वयस्कर माणसाला विचारला तर त्याचे उत्तर कदाचित असे असेल, ‘आजच्या तरुणांना आदर्श बघवत नाहीत आणि आव्हाने पेलत नाहीत.’ खरीच अशी परिस्थिती आहे का? आजची तरुण पिढी ही उद्याची मार्गदर्शक पिढी असेल. त्यामुळे या तरुणांनी दूरदृष्टीने विचार करुन काही मूलभूत आव्हाने पेलणे आवश्यक आहेत.
युवक हा असा वर्ग आहे जो शारीरिक आणि मानसिक रुपाने सर्वात बलवान आहे. जो देशाच्या व समाजाच्या विकासासाठी सर्वात जास्त प्रयत्न करु शकतो. सुदैवाने आपल्या भारतीय लोकसंख्येच्या 34 टक्के इतकी लोकसंख्या युवकांची म्हणजेच 24 ते 40 वर्षे वयोगटाची आहे. हा युवक वर्ग नेहमीच सामाजिक, आर्थिक, शारीरिक, मानसिक रुपाने सदैव सक्रीय असतो आणि रहायलाही हवा. मात्र कोणत्याही देशाच्या बांधणीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱया या युवावर्गाची आजची स्थिती पाहिली तर ती निश्चितच चिंताजनक आहे.


भारतीय युवकांची स्थिती चिंताजनक आहे असे म्हटल्यावर याचे देशावर काय परिणाम होतील हे वेगळे सांगायला नको. आजचा युवक व्यसनांच्या आहारी गेलेला, भ्रष्ट राजकारणी व चित्रपटातील अभिनेत्यांचा आदर्श डोळय़ांसमोर ठेवणारा, गुन्हेगारी प्रवृत्ती व दहशतवादाकडे वळलेला दिसतो. या स्थितीला फक्त युवकच जबाबदार आहे असे म्हणून आपली जबाबदारी झटकून मोकळे होता येणार नाही. जेव्हा आपण भारतीय युवकांच्या वर्तमानकालीन स्थितीबद्दल भळभळून बोलतो, त्यांच्या भविष्याच्या बाबतीत चिंता व्यक्त करतो तेव्हा आपण भूतकाळात डोकावून पाहिले पाहिजे.
स्वातंत्र्यपूर्व काळात भगतसिंग, राजगुरु, चंद्रशेखर आझाद, सुखदेव हे युवक त्या काळच्या युवकांचे आदर्श आणि प्रेरणास्थान होते. ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग केला. प्रसंगी प्राणाचेही बलिदान दिले. देशासाठी हसत-हसत फासावर चढणाऱया या देशवेडया तरुणांना पाहून समकालीन युवकांच्या रक्तात एक वेगळा उत्साह संचारत होता. ते युवक या तरुणांना आपला आदर्श मानत मात्र त्यांनी कधी याची जाहीरातबाजी केली नाही.
भूतकाळ जेवढा खराब तसा वर्तमान, त्याची सावली आणि भविष्य तर आणखीनच खराब. एकायला-वाचायला या गोष्टी नक्कीच निराशाजनक वाटतील परंतु थंड डोक्मयाने जर विचार केला, स्वत:लाच जर प्रश्न विचारला की, आजच्या युवापिढीला मागच्या पिढी ने काय ‘वारसा’ दिलाय? कसले संस्कार आणि कसला समाज दिलाय? तर आजच्या युवकांच्या या अवस्थेचे उत्तर निश्चित मिळेल.