नेत्रावळी-सांगेतील अमित नाईक यांची भूतदया : लॉकडाऊनमध्ये दिवसाकाठी देतात सुमारे 500 श्वानांना अन्न


प्रतिनिधी / मडगाव
कृपया मानव व्हा ….. कुणालाही मारू नका … सर्व प्राणी हे आपल्या इतकेच या पृथ्वीचा भाग आहेत. भटकी कुत्रे (श्वान) त्याला अपवाद नाहीत. कोरोना व्हायरसमुळे सध्या गोव्यात 21 दिवसांचा लॉकडाऊन आहे. या काळात भटकी कुत्री उपाशी पडू नये यासाठी नेत्रावळी-सांगे येथील सामाजिक कार्यकर्ते अमित नाईक यांची गेले तेरा दिवस सतत धडपड सुरू आहे.
21 दिवस चाललेला लॉकडाऊनमुळे रस्त्यावर अन्नाशिवाय राहणाऱया भटक्मया कुत्र्यांसाठी सर्वात कठीण वेळ आला आहे. या भटक्या कुत्रांसाठी देवदूत बनलेय ते अमित नाईक. काही देणगीदारांच्या मदतीने ते भटक्या कुत्र्यांना खाद्य पुरवित आहेत. आत्तापर्यंत त्यांनी नेत्रावळी, सांगे, केपे, कुडचडे, सावर्डे, फातोर्डा, मडगाव, कुंकळळी, फातर्पा, कोलवा, उतोर्डा, आरोशी, दाबोळी विमानतळ, वास्को, दोनापावल-पणजी, तालीगांव गोवा विद्यापीठ परिसर, पाळोळे-काणकोण इत्यादी भागातील भटक्या कुत्र्यांना अन्न पुरविले आहे.
दिवसाकाठी देतात सुमारे 500 श्वानांना अन्न
दिवसा साधारपणे 500 श्वानांना ते अन्न घालीत असतात. स्वतःच्या घरात त्यांनी 80 श्वान पाळले आहेत. त्यांची सेवा करतानाच आत्ता लॉकडाऊनच्या काळात भटक्या कुत्र्यांना अन्न पुरविण्याचे काम ते करीत आहेत. भटकी कुत्री उपाशी राहून त्यांना मृत्यू येऊ नये यासाठी आपली धडपड चालू असल्याची माहिती त्यांनी दिली. आज सर्व बाजारपेठा बंद आहेत. खासकरून मासळी मार्केट, त्यामुळे या भटक्या कुत्र्यांना खाद्य मिळणे मुश्किल झालेले आहे. त्याचबरोबर लोक आपल्या घरात देखील काटकसर करू लागले आहेत. त्यामुळे पूर्वीप्रमाणे या भटक्या कुत्र्यांना अजिबात अन्न मिळत नाही. अनेक भागात भटकी कुत्रे उपाशी असल्याची माहिती लोक अमितला देत असतात. खासकरून विदेशी पर्यटक तसेच पोलीस यांचा त्यात समावेश आहे.
अमित यांनी पहिल्या दिवसापासूनच भटक्या कुत्र्यांना आहार देणे सुरू केले आहे. आपले स्वतःचे वाहन घेऊन ते फिरत असतात. कुत्र्यांचा आहार तयार करण्यासाठी दररोज 35 किलो तांदुळ, 20 किलो चिकन वापरात आणले जाते. हा आहार अमित स्वतः तयार करीत असतात. त्या शिवाय कुत्र्यांची पिल्ले व मांजर यांच्यासाठी 5 लिटर दूध ही ते सोबत घेऊन जातात. लॉकडाऊनच्या काळात मांजरांची देखील परिस्थिती खूपच वाईट झाल्याची माहिती त्यांनी दिली. भटकी कुत्री सर्वत्र फिरू शकतात. पण, मांजर इतर ठिकाणी जाऊ शकत नसल्याने त्याची परिस्थिती वाईट झाली आहे.
अमित यांना प्रवासादरम्यान पोलिसांनी बऱयाच वेळा रोखले, काही पोलिस अधिकाऱयांनी शेकडो प्रश्न विचारले परंतु बऱयाच लोकांनी सहकार्य केले आणि त्याच्या कामात मदत केली. विदेशी पर्यटक देखील मदत करण्यात मागे राहिले नाहीत. केवळ भटकी कुत्री व मांजरेच उपाशी पोटी नाहीत तर बेघर लोक देखील भुकलेले आहेत. याचा अनुभव देखील त्यांनी घेतलाय. मडगावात, जेव्हा ते कुत्र्यांना अन्न देत होते, तेव्हा तीन बेघर भुकेल्या लोकांनी त्यांच्याकडे अन्न मागितले. आता काही प्रमाणात भुकेलेल्या लोकांची समस्या दूर झाली आहे. पण, भटकी कुत्री बऱयाच ठिकाणी उपाशी पोटीच आहेत.
या समस्येकडेही सरकारने लक्ष द्यावे
अमित नाईकने भटक्या कुत्र्यांना आहार देण्यास प्रारंभ केल्यानंतर अनेकांनी या कामी पुढाकार घेतला आहे. काही एनजीओचे स्वयंसेवक भटक्या कुत्र्यांना बिस्किट घालताना आढळून येतात. या बिस्किट किती प्रमाणात भूक दूर करणार हा प्रश्न आहेच. सरकारने यासाठी उपाय योजना आखणे खूपच महत्त्वाचे आहे. कारण, भटक्या कुत्र्यांमुळे आपला परिसर स्वच्छ राहतो. अनेक टाकावू पदार्थांवर ती जगत असतात. हे टाकावू पदार्थ कुजले तर त्यांची दुर्गंधी सर्वत्र पसरते. ते आरोग्याला अपायकारक असते. त्यामुळे भटक्या कुत्र्यांकडे सरकारने दुर्लक्ष करू नये, अशी मागणी अमित नाईक यांनी केली.