मुंबई \ ऑनलाओईन टीम
राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी लॉकडाऊनमध्ये शिथीलतेची घोषणा केल्यावर हा निर्णय विचारधीन असल्याचे राज्य सरकारने सांगितले. यामुळे नागरिकांच्याच गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. महाविकास आघाडी सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आहेत आणि अनेक सुपरमंत्री आहेत. अनेक मंत्री हे स्वतःला मुख्यमंत्री समजतात आणि स्वतः घोषणा करतात, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलताना म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आहेत आणि अनेक सुपरमंत्री आहेत. अनेक मंत्री हे स्वतःला मुख्यमंत्री समजतात आणि स्वतः घोषणा करत असतात. खरं म्हणजे कुठल्याही सरकारमध्ये पॉलिसी निर्णय घेण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असतो परंतु एखाद्या विषयावर मुख्यमंत्र्यांना वाटलं तर मंत्री नेमतात आणि त्यांनी सांगितल्यानुसार ते मंत्री बोलत असतात. पण या सरकारमध्ये एका विषयावर मुख्यमंत्र्यांच्या ऐवजी पाच – पाच मंत्री बोलतात. जे मुख्यमंत्र्यांनी बोलले पाहिजे त्यांच्याकडून काही उत्तर येत नाही. परंतु अधिच पाच मंत्री बोलतात आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सगळे मंत्री निर्णय जाहीर केल्यावर सांगतात हा निर्णय मुख्यमंत्री घेतील. म्हणजे एकप्रकारे प्रत्येक गोष्टीचे श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.
तसेच ते पुढे म्हणाले की, श्रेय घ्या पण कमीतकमी घ्या. गुरुवारचा घोळ यातूनच झाला आहे. हा पहिलाच घोळ नाही आहे यापुर्वीही असेच घोळ झाले आहेत. अनेकवेळा मंत्र्यांनी निर्णय जाहीर केलेत. एका विषयावर तीन तीन मंत्र्यांनी निर्णय जाहीर केले असल्याचे आपण पाहिले आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांनी कुठेतरी आपल्या मंत्र्यांना शिस्त लावली पाहिजे. किमान महत्त्वााच्या विषयांचे निर्णय हे स्पष्ट जनतेपर्यंत पोहोचले पाहिजेत, असे मत देवेंद्र फडणवीय यांनी मांडले.
लॉकडाऊनवरून लोकांच्यात एवढे गोंधळाचे वातावारण आहे की, लोकांचे आम्हाला फोन आले की, लॉकडाऊन आहे की नाही. याचे उत्तर आमच्याकडे पण नव्हते. पण शेवटी सांगितले की, मुख्यमंत्र्यांकडून आलेली प्रसिद्धी नोटमध्ये म्हटले आहे की, ५ टप्पे आहेत यावर आम्ही विचार करत आहोत. त्यामुळे हा संभ्रम आहे. तसेच ७ ते २ दुकाने सुरु ठेवण्याचा निर्णय चुकीचा वाटतो आहे. किमान हा निर्णय ९ ते ४ करावा, अशी लोकांची मागणी असल्यची देखील देवेंद्र फडणवीस यांनी यावेळे सांगितले.

