मुंबई \ ऑनलाईन टीम
संसदीय अधिवेशनादरम्यान सभागृहात पुरुष मार्शलने महिला सदस्यांसोबत धक्काबुक्की केली आहे. महिला सदस्यांचा अपमान झाला असून लोकशाहीत अशा घटना योग्य नसल्याचे राष्ट्रवादी नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. राष्ट्रपतींनी तसेच लोकसभा अध्यक्षांनी या घटनेबाबत चिंता व्यक्त केली आहे. परंतू राष्ट्रपतींनी याबाबत केंद्र सरकारला विचारणा केली पाहिजे होती. राजकीय दबावामुळे राष्ट्रपतींनी तसे केले नसेल असा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.
संसदेत झालेल्या गदारोळावर राष्ट्रवादी नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधताना प्रतिक्रिया दिली आहे. संसदेत महिला सदस्यांसोबत पुरुष मार्शलने धक्काबुक्की केली. बळाचा वापर करण्यात आला. ही घटना अशोभनीय आहे, असं मलिक म्हणाले. महिला सदस्यांचा अपमान करण्यात आला. लोकशाहीत अशाप्रकारची घटना योग्य नाही. यावर लोकसभा अध्यक्ष व राष्ट्रपतींनी चिंता व्यक्त केली. परंतु त्यांनी सरळ- सरळ केंद्रसरकारला याप्रकरणी विचारणा करण्याची गरज होती. मात्र त्यांनी राजकीय दबावामुळे तसे केले नसावे, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली आहे.
संसदेचे कामकाज दोन दिवसाअगोदर स्थगित करण्यात आले. याचा अर्थ केंद्रसरकार जनतेच्या प्रश्नापासून पळ काढत होते. पेगॅसस हेरगिरी प्रकरण, शेतीचा कायदा असेल, जातनिहाय जनगणना असेल या सर्व प्रश्नांवर चर्चा न करता किंवा त्याचे उत्तर न देता संसदेचे कामकाज स्थगित करण्यात आले. याचा अर्थ संसदेत कोणतेच उत्तर द्यायचे नाही असे धोरण सरकारचे होते, असा दावाही त्यांनी केला.

