आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाज शास्त्रज्ञ, श्रमिक मुक्ती दलाच्या संस्थापक सदस्या व धोरण समितीच्या सदस्या, बुद्ध, फुले, आंबेडकर, मार्क्स यांच्या व स्त्री-मुक्तीवादी विचारांची, संत साहित्याची आणि वारकरी तत्वज्ञानाची अभ्यासपूर्ण अशी नव्या पद्धतीची मांडणी करून समाजापुढे आणणाऱया ज्ये÷ संशोधक-लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉ. गेल ऑम्व्हेट (शलाका पाटणकर) यांचे वयाच्या 81 व्या वषी बुधवारी सांगली जिह्यातील कासेगाव येथे वृद्धापकाळाने निधन झाले. स्त्री मुक्ती चळवळ, परित्यक्ता स्त्रियांची चळवळ, आदिवासी चळवळीमध्ये त्यांचे योगदान केवळ अभ्यास आणि लेखनापुरते मर्यादित नव्हते तर त्या प्रश्नाच्या अंतरंगात उतरून त्यासंबंधीचे उत्तर शोधण्यासाठी आवश्यक चळवळही त्यांनी केली आणि आपले शलाका हे भारतीय नाव खरे करून दाखवले. शलाका या शब्दाचा एक अर्थ धातूची अशी पट्टी, जी प्रश्नाच्या उत्तरासाठी एखाद्या ग्रंथात ठेवावी आणि त्या पानाचे वाचन करून प्रश्नांच्या उत्तरांचा अर्थ लावावा! डॉ. गेल ऑम्व्हेट यांनी आपल्या आयुष्यातला बराच काळ भारतातील अनेक सामाजिक प्रश्न केवळ मांडण्यासाठी नव्हे तर त्या प्रश्नांवर उत्तरे शोधत ती प्रत्यक्षात कृतीत आणण्यासाठी खर्ची घातला. अमेरिकेसारख्या समृद्ध राष्ट्रात जन्माला आलेली एक स्त्री अभ्यासाच्या निमित्ताने भारतात येते आणि इथलीच बनून जाते. इथल्याच मातीत एकरुप होते हे तसे अभावाने आढळणारे चित्र. मात्र त्यांनी ते आपल्या जीवन कार्यातून प्रत्यक्षात उतरवले आहे. अमेरिकेच्या साम्राज्यवादी, युद्धखोर प्रवृत्तीविरोधी उभ्या राहिलेल्या तरुणाईच्या चळवळीत त्या अग्रस्थानी होत्या. अमेरिकेत पदव्युत्तर शिक्षण झाल्यानंतर त्या भारतात आल्या. वेगवेगळय़ा चळवळींचा अभ्यास करत असताना त्या महाराष्ट्रात आल्या आणि महात्मा फुले यांनी केलेल्या संघर्षाला आपलेसे केले. पुढे महात्मा फुले यांच्या चळवळीवरच त्यांनी वसाहतिक समाजातील सांस्कृतिक बंड (नॉन ब्राम्हीण मूहमेन्ट इन वेस्टर्न इंडिया ) हा आपला पीएचडी प्रबंध अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया बरकली विद्यापीठात सादर करून डॉक्टरेट पदवी संपादन केली. त्यांच्या पूर्वी महात्मा फुले यांच्या चळवळीवर भारतातील कोणीही इतका सविस्तर अभ्यास करून, महाराष्ट्रभर फिरून मांडणी केली नव्हती. त्यांचा हा प्रबंध भारतातच नव्हे तर जगभरात अभ्यासकांना मैलाचा दगड ठरला. या अभ्यासादरम्यानच महाराष्ट्रातील कृतीशील सुहास परांजपे, सुधीर बेडेकर, डॉ. भारत पाटणकर, डॉ.आनंद फडके या मार्क्सवाद्यांबरोबर कार्य सुरू केले. भारतीय समाज, इथली जाती व्यवस्था आणि त्याविरुद्धचा संघर्ष याच्या अभ्यासातून त्यांनी येथे आपण कार्य केले तर बदल घडू शकतो असा विचार करून भारतातच राहण्याचा निर्णय घेतला. आणि आणिबाणीत डॉ. भारत पाटणकर यांच्यासारख्या चळवळी व्यक्तीशी विवाह केला. आणिबाणी नंतर भारतात येऊ घातलेल्या सामाजिक चळवळींच्या अभ्यासपूर्ण नोंदीच्या ग्रंथा बरोबरच दक्षिण भारतातील दलित अत्याचार आणि त्या संबंधीच्या चळवळींचा वेध त्यांनी घेतला. आपल्या सासुबाई इंदुमती पाटणकर यांच्या आणि अन्य सामाजिक कार्यकर्त्या स्त्रियांच्या सोबतीने परित्यक्ता स्त्रियांच्या प्रश्नांवर कृतीशील आंदोलन छेडले.परित्यक्तेचे समाजात पुनर्वसन होत नाही हा मुद्दा घेऊन त्यांनी महाराष्ट्रात केलेल्या कार्यामुळे परित्यक्ता स्त्रीला कुटुंबप्रमुख म्हणून मान्यता मिळाली. तिच्या नावाने रेशन कार्ड निघाले. सातबारा आणि घरावर परित्यक्ता स्त्रीचे नाव लागू लागले आणि समाजात तिचेही स्थान निर्माण झाले. ही त्या काळावरच नव्हे तर पुढच्या अनेक पिढय़ांवर उपकारक ठरणारी कामगिरी त्यांनी घडवून दाखवली. त्या भारतभर फिरत आणि लिहीत राहिल्या. वेगवेगळय़ा चळवळीत पुढाकारात आणि सहभाग घेत राहिल्या आणि चळवळींच्या बौद्धिक मार्गदर्शक बनून भारतभर मांडणी करू लागल्या. सांगली जिह्यातील दुष्काळी खानापूर तालुक्मयामध्ये दुष्काळ निर्मूलन चळवळ, दुष्काळ निर्मूलनासाठी बळीराजा धरणाची निर्मिती यासाठी झालेल्या संघर्षात त्या नेहमीच अग्रेसर राहिल्या. श्रमिक मुक्ती दलाच्या विविध चळवळीतही त्या सक्रीय होत्या. डॉ. गेल यांनी देश विदेशातील विविध विद्यापीठात प्राध्यापक, अध्यासन प्रमुख तसेच संयुक्त राष्ट्रांच्या विकास कार्यक्रमात त्यांनी योगदान दिले. अनेकांना कदाचित माहित नसेल मात्र शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेच्या त्या कडव्या विरोधक होत्या मात्र नंतर अभ्यासाअंती त्यांचे मत बदलले. महिलेला शेताची मालकीण बनवले पाहिजे हा शरद जोशींनी चांदवडच्या ऐतिहासिक परिषदेत मांडलेला विचार हा डॉ. गेल ऑम्व्हेट यांच्या मूळ विचारांचा प्रभाव असावा. पुढे शेतकऱयांनी जोशींची साथ सोडली मात्र शेतकरी महिलांनी शेतकरी संघटना आणि चळवळ यशस्वीपणे चालवली. यामध्ये डॉ. गेल यांचाही मोलाचा सहभाग होता. त्यामुळे श्रमिक मुक्ती दलापासून त्यांना दूर व्हावे लागणे मात्र त्यांचे आणि पती भारत पाटणकर यांचे या विषयावरील वैचारिक मतभेद त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात वादळ निर्माण करू शकले नाही ही आजच्या काळातील कार्यकर्त्यांसाठी खूपच मार्गदर्शक अशी घटना! भारताचे प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी समाजशास्त्र आणि इतिहास यांच्यातील सीमा मोडून काढण्याचे काम डॉ. गेल ऑम्व्हेट यांनी केले असा गौरव केला आहे. आंदोलन, चळवळी आणि घटनांच्या दस्तऐवजीकरणाबरोबरच प्रत्यक्ष कार्यातही त्या होत्या, सातारच्या प्रती सरकारवर त्यांनी प्रकाशित केलेले पुस्तक आगळेवेगळे होते. महान जातीविरोधी समाजसुधारकांबरोबरच भारतीय महिला चळवळीवर, शेतकरी आणि पर्यावरण संघर्षावर त्यांचे ग्रंथ आणि अंतर्दृष्टीपूर्ण निबंध लिहून हे विषय जगासमोर आणल्याचा गौरव डॉ. गुहा यांनी केला आहे. मार्क्सवादाबरोबरच भारतीय समाज विज्ञान परिषदेच्या मदतीने भक्ती या विषयावर केलेली ग्रंथनिर्मिती आणि तुकारामांचे अभंग इंग्रजीत आणण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान खूपच मोठे आहे. अमेरिकेतून येऊन भारतीय आणि मराठी मातीत आपले आयुष्य खर्ची घालणाऱया या विद्वान चळवळय़ा स्त्रीच्या लेखन कार्याला मराठीत आणणे आणि पुढच्या पिढीला त्यांच्या विचाराचे सोने बहाल करणे हीच त्यांना मोठी श्रद्धांजली ठरेल.


previous post