इस्लामपूर / प्रतिनिधी
खाजगी सावरकारांच्या धमकीला कंटाळून येथील उरुण परिसरातील खांबे गल्लीतील प्रकाश वसंत साठे (४५ ) या केळी व्यावसायिकाने राहत्या घरी लाकडी वाशाला साडीने गळफास लावून घेवून आत्महत्या केली. ही घटना गुरुवार सायंकाळी ६ वाजण्यापूर्वी घडली. १० हजार रुपयांच्या वसुली पोटी ६० हजार रुपयांची मागणी करुन साठे यांची मोटारसायकल जबरदस्तीने काढून घेतली होती. पोलीसांनी याप्रकरणी दोघा संशयीतांना अटक केली आहे.
महेश शंकर पाटील( ३५.रा.मंत्री कॉलनी ) व प्रविण बाबासो पाटील( ३५,सिध्देश्वरनगर, उरुण इस्लामपूर ), अशी संशयीत आरोपींची नावे आहेत. महेश हा विमा प्रतिनिधी म्हणून काम करतो. साठे हे पत्नी, मुलगा, व दोन मुली यांच्यासह राहत होते. ते केळी विक्रीचा व्यवसाय करीत होते. मार्च २०२० पासून कोरोनामुळे त्यांनी व्यवसाय बंद केला.
सध्या साठे हे हमाली करीत होते. मार्च २०२० मध्ये साठे यांनी धंद्यासाठी महेश पाटील यांच्याकडून व्याजाने १० हजार रुपये घेतले होते. मे २०२० पासून महेश व प्रविण पाटील हे प्रकाश साठे यांना वारंवार फोन करुन व्याजाची मागणी करीत होते. व्यवसाय सुरु झाल्यानंतर पैसे देतो, असे साठे सांगत होते. पण हे सावकार मोबाईल वरून व घरी जावून त्रास देत होते.


previous post