जतेत 70 बेडच्या कोविड रुग्णालयाचे लोकार्पण
प्रतिनिधी / जत
मागील काही दिवसांपासून जत तालुक्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने होणारी वाढ पाहता थोडी अस्वस्थता होती. मात्र जतसाठी ७० बेड्सचे डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरू करु शकलो याचे समाधान आहे.तालुक्यात रुग्णसंख्या वाढत असून कोरोना रोखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.जत येथील कोविड सेंटरचे लोकार्पण बुधवार दि.१९ रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे केले त्यानिमित्त मंत्री पाटील बोलत होते.
यावेळी आमदार विक्रमसिंह सावंत,जि. प.अध्यक्षा प्राजक्ता कोरे,माजी आमदार विलासराव जगताप,जिल्हाधिकारी अभिजित चौधरी,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी ,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार,प्रांताधिकारी प्रशांत आवटे,तहसीलदार सचिन पाटील,पोलिस उपविभागीय अधिकारी रत्नाकर नवले,प्रभारी पोलीस निरीक्षक गोपाळ भोसले गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तिकर आदी उपस्थित होते.
मंत्री पाटील पुढे म्हणाले की, जत आणि सांगली शहर हे अंतर फार आहे. हे अंतर लक्षात घेता जत शहरात ७० ऑक्सिजन बेड्सची सुविधा असणारे कोविड सेंटर उभारले. या सेंटरमुळे परिसरातील रुग्णांना सहाय्य होणार आहे. मात्र वाढणारी रुग्ण संख्या कमी करणे हे आपले प्राथमिक ध्येय आहे आणि त्यासाठी सर्वांनी लॉकडाऊनची बंधने पाळणे आवश्यक आहे.
यावेळी आमदार विक्रमसिंह सावंत म्हणाले की, तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सध्याचे सुरू होणारे ७० ऑक्सिजनचे बेड उपयोगी ठरणार आहे.मात्र तालुक्यातील नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
कार्यक्रमाला उपनगराध्यक्ष आप्पासाहेब पवार,जि. प.सदस्या सुनीता पवार,जि. प.सदस्य महादेव पाटील,जि. प.सदस्य तम्मनगौडा रवी पाटील,ब्रह्मानंद पडळकर,नगरसेवक उमेश सावंत,नगरसेवक टिमू एडके,नगरसेवक भूपेंद्र कांबळे,नाना शिंदे,नगरसेवक प्रमोद हिरवे,नगरसेवक स्वप्नील शिंदे,संग्राम जगताप,सुनील पवार,युवराज निकम,प्रभाकर जाधव , आण्णा भिसे, सद्दाम अत्तार, संतोष मोटे आदी उपस्थित होते.
आ सावंत पडळकर, रवीपाटील वाद
या कोविड रुग्णालयाच्या मंजुरीवरून अगोदरच सोशल मीडियावर वाद सुरू होता, त्याची ठिणगी या उदघाटन कार्यक्रमात पडली, रुग्णालयाच्या श्रेयवादावरून आ सावंत, ब्राह्मनंद पडळकर, तमम्मनगौडा रवीपाटील यांच्यात जोरदार शाब्दीक चकमक झाली, पदाधिकारी, अधिकारी यांनी मध्यस्थी केल्यानंतर प्रकरण शांत झाले, परुंतु अशा संकटाच्या काळात सर्वांनी मतभेद विसरून काम केले पाहिजे, असे प्रकार घडणे अशोभनीय असल्याची चर्चा सुरू होती.