तरुण भारत संवाद पंढरपूर / प्रतिनिधी
माघ शुध्द एकादशीचा सोहळा 23 फेब्रुवारी रोजी होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता एकादशीला पंढरपूर शहरासह शेगाव दुमाला, लक्ष्मी टाकळी, वाखरी ,गोपाळपुर , कोर्टी ,गादेगाव , शिरढोण, कौठाळी , चिंचोली भोसे, भटुंबरे अशा गावातही संचारबंदी लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी रात्री उशिराने पारित केले. त्यामुळे चैत्री, आषाढी, कार्तिकी नंतर विठ्ठलभक्तांची माघी वारीही चुकणार आहे.
या वारीच्या अनुषंगाने 22 आणि 23 फेब्रुवारी असे दोन दिवस विठ्ठलाचे मुखदर्शन सामान्य भाविकांना पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याचा निर्णय मंदिर समितीने यापूर्वीच घेतला आहे. तसेच माघी वारीसाठी पंढरपूर कडे येणाऱ्या पायी दिंड्यांना अटकाव करणे. शहरातील मठ धर्मशाळा मध्ये भाविकांना वास्तव्य करू न देणे. असेही आदेश यानिमित्ताने पारित झाले आहे. तसेच शहरात दूरवरचे ठिकाण निश्चीत करुन एसटी सेवेतील प्रवासी वाहतूक सुरळीत चालू ठेवण्याच्या दृष्टीने स्थानिक पातळीवर योग्य त्या उपाययोजना करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आलेले आहेत. परंतु या प्रवासी सेवेतून येणाऱ्या भाविकांना मंदिराकडे तथा शहरात प्रवेश नसेल. ही सेवा केवळ तातडीची आपत्कालीन सेवा राहील. असेही जिल्हाधिकारी यांनी आपल्या आदेशात नमूद केले आहे.


next post