ऑनलाईन टीम / मुंबई :
संजय राठोड यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता त्या रिक्त जागेसाठी शिवसेनेत जोरदार लॉबिंग सुरु झाले आहे. या शर्यतीत आता हरिभाऊ राठोड यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहे. संजय राठोड यांच्या ठिकाणी आता मला वनमंत्री करा, अशी मागणी हरिभाऊ राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.
हरिभाऊ राठोड यांनी सात मार्चला आणि 11 मार्चला अशी दोन पत्रं मुख्यमंत्र्यांना लिहली आहेत. बंजारा समाजाची सेनेला गरज आहे, मी आपली आमदारकी तुम्हाला मुख्यमंत्री बनवायला धोक्यात आणली असून मला काँग्रेसच्या कोट्यातून सहज मंत्रीपद मिळाले असते असे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
आपण विधानसभेच्या निवडणुकीवेळी शिवसेनेच्या आमदारांना निवडूण आणण्यासाठी काम केल्याचे सांगून आपला संपर्क आणि काम प्रत्येक जिल्ह्यात असल्याचा उल्लेख हरिभाऊ राठोड यांनी केला आहे. आपण भटक्या विमुक्त जाती, बारा बलुतेदार आणि ओबीसी समाजाचे नेतृत्व केल्याचे सांगत हरिभाऊंनी आपल्याला मंत्रिपदाची संधी मिळाली तर त्याचा फायदा शिवसेनेला संपूर्ण राज्यात होईल असे म्हटले आहे.
पहिल्या पत्रात उद्धव ठाकरे ह्यांना मुख्यमंत्री करण्यासाठी आपण किती प्रयत्न आपण केले हे सांगत 10 मिनिटे वन टू वन चर्चा करण्यासाठी वेळ मागितली. संजय राठोड प्रकरणामुळे राजकीय परिस्थिती बदलली असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. शिवसेनेला नंबर एकचा पक्ष बनवायचे आहे म्हणून सुद्धा ही वेळ मागितली आहे असेही त्यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.
संजय राठोड हे सध्याचे बंजारा समजाचे निर्विवाद नेते आहेत. त्यांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्यानंतर बंजारा समाजाच्या नेत्यांत नेतेपदासाठी आणि मंत्रिपदासाठी नवी शर्यत सुरु झाल्याचे पहायला मिळत आहे.