पुणे / प्रतिनिधी :
महाराष्ट्रविरूद्ध ओडिसा यांच्यात गहुंजे मैदानावर सुरू असलेल्या रणजी ट्रॉफी सामन्यात महाराष्ट्राचा कर्णधार अंकीत बावणेचे नाबाद द्विशतक, नौशाद शेखचे शतक आणि राहुल त्रिपाठीच्या आक्रमक 65 धावांच्या जोरावर महाराष्ट्राने 5 बाद 543 धावांचा डोंगर उभा करत 250 धावांची भक्कम आघाडी मिळवली. गुरुवारी दिवसअखेरपर्यंत ओडिसाच्या दुसऱया डावात बिनबाद 24 धावा झाल्या आहेत.
महाराष्ट्राने कालच्या 2 बाद 219 पासून आज ऋतुराज आणि अंकितने पुढे खेळण्यास सुरूवात केली. परंतु, ऋतुराज फार काळ मैदानावर तग धरू शकला नाही. ऋतुराज बाद झाल्यावर अंकितने नौशादच्या साथीने खेळ करत आपले द्विशतक साजरे केले, तर दुसऱया बाजूला नौशादनेदेखील शतक ठोकले. या दोघांनी मिळून 180 धावांची भागीदारी रचली. यात अंकितने 406 चेंडूत 21 चौकार व एका षटकाराच्या मदतीने नाबाद 204 धावांची खेळी केली. तर नौशाद शेखने 157 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने 100 धावा केल्या. नौशाद बाद झाल्यानंतर आलेल्या राहुल त्रिपाठीने त्याच्या आक्रमक शैलीत फलंदाजी करत महाराष्ट्राला 250 धावांची आघाडी मिळवून दिली.
राहुलने 48 चेंडूत 7 चौकार 4 षटकारांच्या मदतीने 65 धावा केल्या. यामुळे महाराष्ट्राने 5 बाद 543 धावांचा डोंगर उभा केला. आजच्या दिवसअखेर ओडिसाने आपला दुसरा डाव सावधपणे सुरू केला असून, त्यांच्या बिनबाद 24 धावा झाल्या आहेत. उद्या शेवटच्या दिवशी ओडिसाला डावाने पराभव टाळायचा असल्यास चांगला खेळ करावा लागेल, तर महाराष्ट्राच्या गोलंदाजांना अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत विजयश्री खेचून आणावी लागेल.