कारवार जिल्हाधिकाऱयांना नागरिकांचे निवेदन
प्रतिनिधी / कारवार
अंकोला येथील हिंदू स्मशानभूमीची योग्य ती दोखरेख, संरक्षण करून आधुनिक शवदाहिनीसह स्मशानभूमीत इतर पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी अंकोला येथील हिंदू स्मशानभूमी समितीने शुक्रवारी जिल्हा प्रशासनाकडे केले.
समितीचे पदाधिकारी व सदस्यांनी जिल्हाधिकारी हरीशकुमार के. यांची भेट घेऊन सादर केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, अंकोला शहराला लागून असलेल्या हिंदू स्मशानभूमीत गेल्या अनेक शतकापासून अंत्यसंस्कार करीत आहेत. अंत्यसंस्कारासाठी सात एकर दोन गुंठे जमीन राखीव ठेवली आहे. सरकारी नोंदीनुसार स्मशानभूमीची मेंटेनन्सची जाबाबदारी अंकोला नगरपंचायतीकडे सोपविण्यात आली आहे. तथापि, स्मशानभूमी पायाभूत सुविधांपासून वंचित आहे. स्मशानभूमीतील स्वच्छतेकडे संबंधितांकडून लक्ष दिले जात नाही. चारी बाजुला संरक्षक भिंत नसल्यामुळे स्मशानभूमीवर अतिक्रमण करण्यात आले आहे. त्यामुळे अतिक्रमण हटवून स्मशानभूमीचे रक्षण करावे अशी मागणी करण्यात आली.
स्मशानभूमीची स्वच्छता करावी, अंत्यसंस्कारासाठी लाकडे उपलब्ध करून द्यावीत. त्याचबरोबर स्मशानभूमीत आधुनिक शवदाहिनीची व्यवस्था करावी, अशा मागण्याही केल्या आहेत. यावेळी समितीचे गौरव अध्यक्ष आणि वकील रविंद्र नाईक, अध्यक्ष सुरेश वर्णेकर, तिपाय्या नाईक, मोहन नाईक, उदय नाईक, सुरेश नागप्पा नाईक, चंद्रकांत नाईक, शिवानंद नाईक, संजय नाईक आरती नाईक, अभिजीत शेणवी, राजेश नाईक आदी उपस्थित होते.