अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे निवेदन
बेळगाव : अंगणवाडी इमारतींमध्ये सुविधा नाहीत. विद्यार्थ्यांची संख्या पाहता अंगणवाडीचे वर्ग कमी पडत आहेत. असे असताना याठिकाणी पाळणाघर करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. त्याला आमचा विरोध आहे. तेव्हा सरकारने अंगणवाडीमध्ये पाळणाघर करू नये, अशी मागणी अंगणवाडी वर्कर्स ऍण्ड हेल्पर्स फेडरेशनच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. अंगणवाडींमध्ये शिक्षिका आणि मदतनीस कर्मचारी सकाळी 9.30 पासून दुपारी 4 पर्यंत काम करतात. विद्यार्थ्यांना शिक्षण देणे, पौष्टिक आहार देणे व खेळ घेणे हे काम नियमित करतात. यावेळी अनेक अडचणींचा सामना त्यांना करावा लागत आहे. त्यामुळे शिक्षिका आणि कर्मचाऱयांवर तणाव येत आहे. बऱयाचवेळा या समस्यांचा परिणाम विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होत आहे. तेव्हा अंगणवाडीचा कारभार सुधारण्यासाठी योग्यप्रकारे सोयीसुविधा पुरवाव्यात, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. अंगणवाडीमध्ये 3 ते 6 वर्षांपर्यंतच्या मुलांना पौष्टिक आहाराबरोबरच शब्दांची ओळख करून दिली जाते. त्यांना दुपारी आहार द्यावा लागतो. त्यानंतर काहीवेळ झोपण्यासाठीही प्रोत्साहित केले जाते. मात्र, कोणत्याही प्रकारच्या सुविधा नसल्याने अनेक अंगणवाडय़ांमध्ये समस्या निर्माण होत आहेत. तेव्हा सरकारने या समस्या सोडविण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली. अंगणवाडीबरोबरच शिशु केंद्रांमध्येही आवश्यक सुविधा पुरवाव्यात, असेही निवेदनात म्हटले आहे.अंगणवाडीमध्ये काम करत असताना तेथील शिक्षिकांना व मदतनीसांना इतर कामे लावली जात आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम अंगणवाडीमध्ये काम करताना दिसून येत आहे. तेव्हा याचा सारासार विचार करून सोयीसुविधा पुरवा, असे या निवेदनात म्हटले आहे. अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी ऍड. नागेश सातेरी, वाय. बी. शिगीहळ्ळी, मीनाक्षी कोटगी, सुजाता बेळगावकर यांच्यासह अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होत्या.