-कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी आक्रमक
प्रतिनिधी/कोल्हापूर
जुनेच मोबाईल पुन्हा ताब्यात घेऊन पुर्वीप्रमाणे कामकाज करण्यासाठी शासनाकडून दबावतंत्राचा अवलंब केला जात असल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी कोल्हापुर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनच्यावतीने जेलभरो आंदोलन करण्यात आले. महावीर उद्यान येथून मोर्चाद्वारे जिल्हा परिषदेवर पोहोचल्यानंतर तेथे जेलभरो आंदोलन केले जाणार होते. पण अंगणवाडी कर्मचारी महावीर उद्यानातून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील चौकात आल्यानंतर पोलीसांनी त्यांना ताब्यात घेतेले. पोलीस गाडीतून अलंकार हॉल येथे नेऊन त्यांना सोडण्यात आले. यावेळी अंगणवाडी सेविकांनी जोरदार घोषणाबाजी करून शासनाचा तीव्र निषेध केला. आंदोलनस्थळी मोठा पोलीस बंदोबस्त होता.
यावेळी कॉ. आप्पा पाटील म्हणाले, अंगणवाडी कर्मचाऱयांचे मूळ काम लाभार्थ्यांना सहा सेवा देणे हे आहे. त्यांची पूर्तता झाल्यावर केवळ मोबाईल ऍपमध्ये माहिती पाठवण्यात अडचणींमुळे कमी पडल्यामुळे मानधन अथवा लाभार्थ्यांना देण्यात येणाऱया पोषण आहारात कपात करणे अन्यायकारक ठरेल. तरी मानधन अथवा आहार कोणत्याही ऍपला जोडू नये व त्या दोन्हीत कोणत्याही प्रकारची कपात करू नये. मोबाईलवर काम करण्यासाठी सेविका व मदतनिसांना देण्यात येणारा रुपये 500 व 250 प्रोत्साहन भत्ता मिळण्यामध्ये प्रचंड अनियमितता आहे. सेविका काम करत असूनही त्यांना योग्य मिळत नाही. परंतु त्यांच्या मदतनिसांना मिळते. त्यामध्ये सुधारणा करावी. मोबाईलचे वाढलेले काम पाहता या भत्त्यात किमान 2000 व 1000 अशी वाढ करावी, तरच त्यांना न्याय मिळेल.
कॉ.जयश्री पाटील म्हणाल्या, पोषण टॅकर ऍप सदोष असून ते ंपूर्णपणे मराठी भाषेत करून त्यातील सर्व त्रुटी दूर कराव्यात, अन्यथा ऍप रद्द करावे, रिक्त जागांवर ताबडतोब भरती करावी, अंगणवाडी सेविका मदतनीसांना शासनामार्फत युनिफोर्मचे पैसे अद्याप मिळाले नाहीत ते तत्काळ द्यावेत, आदी विविध मागण्यांसाठी शासन आणि प्रशासनाकडे पाठपुरावा सुरु आहे. पण ही बाब गांभिर्याने घेतली जात नसल्यामुळे आंदोलनाची तीव्रता वाढवण्याची वेळ आली आहे. शासनाचे जुने मोबाईल जमा केल्यामुळे यापुढे कोणत्याही परिस्थितीत कर्मचाऱयांना त्यांच्या खाजगी वैयक्तिक किंवा त्यांच्या कुटुंबाच्या सामाईक मोबाईलवर शासकीय काम करण्यास भाग पाडू नये. केंद्र शासनाने लादलेला पोषण ट्रकर ऍप हा सदोष असून तो सर्व अंगणवाडी कर्मचाऱयांवर लादला जात आहे. शासनाने दिलेल्या मोबाईल कमी रॅमचा असल्यामुळे तो डाऊनलोड होत नाही. त्यामुळे त्यासाठी सेविकांना आपल्या खाजगी वैयक्तिक मोबाईलमध्ये तो डाऊनलोड करावा लागला आहे. इंग्रजी न येणाऱया अनेक कर्मचाऱयांना त्यात त्रयस्थांच्या मदतीशिवाय माहिती भरणे शक्य होत नाही. हे एकदाच करण्याचे नाही तर दैनंदिन काम आहे व ते रोज अशा त्रयस्थ व्यक्तींकडून करवून घेणे अशक्य आहे. शिवाय या ऍपमध्ये असलेल्या, डिलिटचा पर्याय नसणे, वर्गवारी किंवा लाभार्थी गट न बदलणे, दैनंदिन करण्याचे काम किंवा द्यायच्या सेवांबाबत कोणतेही मार्गदर्शन केले जात नाही. त्यामुळे तो ऍप संपूर्णपणे मराठी करून त्यातील सर्व त्रुटी दूर करा अन्यथा तो ऍप रद्द करावे. शासनाने दिलेले सर्व जुने मोबाईल परत घेऊन नवीन, चांगल्या दर्जाचे व क्षमतेचे आधुनिक मोबाईल द्यावेत. अन्यथा भविष्यात तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा पाटील यांनी दिला.