प्रतिनिधी / बेळगाव
अंगणवाडी महिला कर्मचाऱयांना सरकारने वेतनवाढ देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले आहे. कोरोना काळातदेखील या महिलांनी काम केले आहे. काम करत असताना 36 महिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 30 लाख रुपये देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मात्र, अद्याप एकाही कुटुंबाला आर्थिक मदत करण्यात आली नाही. यासह इतर मागण्यांसाठी अंगणवाडी महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन दिले.
मागील वषी मार्च महिन्यापासून अंगणवाडी महिलांनी कोरोना काळात जनजागृतीसह इतर कामे केली आहेत. मुख्यमंत्र्यांनी अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या वेतनामध्ये वाढ करतो, असे सांगितले होते. मात्र, अद्याप वेतनामध्ये वाढ करण्यात आली नाही. महत्त्वाचे म्हणजे नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये अंगणवाडी कर्मचाऱयांसाठी कोणतीच तरतूद करण्यात आली नाही. त्यामुळे सरकारने केवळ अंगणवाडी महिला कर्मचाऱयांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. अंगणवाडी कर्मचाऱयांना इतर कोणत्याच सुविधा देण्यात आल्या नाहीत. त्यामुळे अंगणवाडी कर्मचारी महिला अडचणीत आल्या आहेत. 2015 पासून वेगवेगळी आश्वासने देण्यात आली आहेत. मात्र, अद्याप ती पूर्ण करण्यात आली नाहीत. या सर्व मागण्या लागू कराव्यात. अन्यथा, तीव्र आंदोलन करू, असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी ऍड. नागेश सातेरी, माया शिगीहळ्ळी, मिनाक्षी कोटगी, सुजाता बेळगावकर यांच्यासह कार्यकर्त्या उपस्थित होत्या.