‘मन की बात’मधून साधला संवाद
प्रतिनिधी / सातारा :
शासनाचे कोणतेही काम असो ते सुरुवातीला अंगणवाडी सेविकांनाच करावे लागते. कोरोना काळात अंगणवाडी सेविकांनी घरोघरी जावून सर्व्हे केला. मुलांना पोषण आहार शिजवून देण्यापासून त्यांना शिक्षण देण्याचे काम, त्यांच्या लसीच्या वेळा चुकू नयेत याबाबतची दक्षता अंगणवाडी सेविका घेत असतात. हे काम करत असताना अंगणवाडी सेविकांना अतिशय तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागते. त्यामुळे मानधन नको तर पगार द्या अशी मागणी सातारा शहरातील अंगणवाडी सेविकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी सातारा शहर भाजपाच्यावतीने देवेज्ञ मंगल कार्यालयात अंगणवाडी सेविकांना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधण्याची सोय केली होते. हे नियोजन भाजपाचे शहराध्यक्ष विकास गोसावी, ऍड. नितीन शिंगटे, ऍड. प्रशांत खामकर, ऍड. सचिन तिरोडकर, प्रवीण शहाणे, राहुल शिवनामे, डॉ. उत्कर्ष रेपाळ यांच्यासह कार्यकर्त्यांनी केलेली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सातारा शहरातील अंगणवाडी सेविकांशी संवाद साधला. त्यावेळी अंगणवाडी सेविका सुनिता किर्वे, वृंदा नारकर यांनी आपली मते मांडताना अंगणवाडी सेविका ही अतिशय तुटपुंज्या मानधनात आपले काम करते आहे. आपल्या संसाराचा गाढा चालवणे मुश्किल बनले आहे. मानधन नको असून त्याऐवजी अंगणवाडी सेविकांना वेतन हवे आहे. वेतन देण्यात यावे, अशी मागणी केली. प्रंतप्रधानांशी संवाद साधल्यामुळे अंगणवाडी सेविकांमध्ये चैतन्य निर्माण झाल्याचे दिसत होते.