केंद्र सरकार देणार 50 लाख रुपयांचे विमा संरक्षण
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केंद्र सरकार अंगणवाडी सेविका तसेच सहाय्यिकांना मोठा लाभ देणार आहे. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या अंतर्गत 13 लाखांहून अधिक अंगणवाडी सेविका आणि 11 लाखांहून अधिक सहाय्यिकांना 50 लाख रुपयांच्या विम्याचे संरक्षण मिळणार आहे. याबद्दलची माहिती महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे.
कोरोनाकाळात अंगणवाडी आणि आशा कार्यकर्त्यांनी कोरोनाविषयक सेवेवर असताना जोखीम भत्ता तसेच विम्याच्या संरक्षणाची मागणी केली होती. तसेच स्वतःची नियुक्ती कायमस्वरुपी करण्याच्या मागणीवरून देशव्यापी आंदोलन करत होत्या.
स्वतःचे नियमित कार्य आणि कोरोना डय़ुटीबरोबरच आशा आणि अंगणवाडी कार्यकर्त्या ग्रामीण भागात कोरोना लसीकरण मोहीम पुढे नेण्यास महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. आशा कार्यकर्त्या कुठल्याही आरोग्यविषयक समस्येसाठी ग्रामीण क्षेत्रांमध्ये राहणाऱया लोकांसाठी संपर्काचे पहिले केंद्र असतात. आशा कार्यकर्त्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मोहिमेशी संलग्न असून त्यांनी भारताच्या आरोग्य सेवा प्रणालीला विकेंद्रीकृत करण्यात मदत केली आहे. अंगणवाडी सेविकांवर मुलांसाठी सरकारचा पोषण कार्यक्रम चालविण्याची देखील जबाबदारी आहे.