प्रकाश नाचणेकर / राजापूर
‘दिवा लावला ज्ञानाचा, विकास होईल गावाचा’ या उक्तीप्रमाणे भविष्यातील गावाच्या विकासाचा दोर ज्यांच्या हातात आहे, त्या भावी पिढीच्या शिक्षणात कोरोनामुळे खंड पडू नये, याकरीता खरवते कोंडवातील माजी विद्यार्थ्यांनी लॉकडाऊनच्या काळात घरासमोरील अंगणातच शाळा भरवत ज्ञानदानाचे कार्य सुरू ठेवले आहे. कोणताही मोबदला न घेता गावातील पहिली ते बारावीपर्यंतच्या पन्नासहून अधिक मुलांना हे माजी विद्यार्थी शिक्षणाचे धडे देत आहेत. त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर शासानाने लॉकडाऊन जाहीर केले. त्यामध्ये सर्व शाळा बंद करण्यात आल्या. सुरूवातीला महिन्याभरात कोरोना संक्रमण थांबेल आणि सर्व व्यवहार सुरळीत होतील असे वाटत असताना आता आठ महिने झाले तरी परिस्थिती जैसे थे आहे. लॉकडाऊन वाढतच राहिला, त्यामुळे मुलांच्या अभ्यासात खंड पडू लागल्याने पालकांची चिंताही वाढली. शासनालाही त्याची जाण झाल्याने ऑनलाईन शिक्षण प्रणालीचा अवलंब करण्यात आला. मात्र ग्रामीण भागात जिथे साध्या मोबाईलला नेटवर्क नाही, तिथे इंटरनेट कोठून मिळणार. त्यामुळे मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला.
शाळा केव्हा सुरू होतील याची शाश्वती नसल्याने खरवते कोंडवाडीतील सुनिल चौगुले, संतोष भिकणे, भोलेनाथ कानागल, दिपक भिकणे, सागर पळसमकर, विजय भिकणे, हरेश माटल, लिलाधर कानागल या सुशिक्षित तरूणांनी एकत्र येत गावातील मुलांना शिकविण्याचा निर्धार केला. लॉकडाऊनमुळे मुंबईतील अनेक चाकरमानी गावात आले होते. त्यामुळे गावात पहिली ते बारावीपर्यंतची पन्नासहून अधिक मुले होती. एवढय़ा मुलांना बसण्यासाठी प्रशस्त जागा हवी होती. वाडीतीलच श्री.आग्रे यांनी शिकविण्यासाठी जागा दिली आणि दररोज या अंगणात गावातील मुलांची शाळा भरू लागली.
स्थानिक तरूणांसह मुंबईहून आलेले तरूणही अतिशय आत्मियतेने मुलांना शिकवू लागले आणि गावातील मुलेही आवडीने या शाळेत येऊ लागली. गावातीलच नव्हे तर चाकरमान्यांची मुलेही या शाळेत धडे गिरवू लागली. आपण ज्या ठिकाणी जन्मलो, ज्या शाळेत शिकलो, त्या शाळेचे, गावाचे काही देणे लागतो, या भावनेतून गेले पाच ते सहा महिने माजी विद्यार्थी असलेले हे तरूण कोणताही मोबदला न घेता सेवाभावी वृत्तीने मुलांना शिक्षणाचे धडे देत आहेत. लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर चाकरमानी मुंबईला परतले असले तरी स्थानिक तरूणांनी हे ज्ञानदानाचे कार्य आजही सुरू ठेवले आहे. सद्यस्थितीत सुमारे 30 मुले याठिकाणी नियमीत शिक्षण घेत आहेत.
खरवते, कोंडवाडीतील तरूणांच्या या उपक्रमामुळे परिसरातील शाळांमधील शिक्षकांसह पालकांचाही भार हलका झाला आहे. या उपक्रमाबद्दल खरवते गावातूनच नव्हे तर संपूर्ण तालुक्यातून या तरूणांचे कौतुक होत आहे.