साडेचार वर्षांपूर्वीच गोव्याच्या हॅकरचा यल्लापूरनजीक मित्रासह खून, 300 कोटीची रक्कम ट्रान्स्फर करण्याची ऑफर
प्रतिनिधी /बेळगाव
हजारो कोटी रुपयांच्या बिटकॉईन घोटाळय़ाने कर्नाटकात राजकीय भूकंप घडवला आहे. या प्रकरणाचा प्रमुख सूत्रधार श्रीकृष्णा ऊर्फ श्रीकी हा आंतरराष्ट्रीय पातळीवरील कुख्यात हॅकर आहे. या घोटाळय़ाच्या निमित्ताने सध्या डिजिटल वॅलेट, ब्लॉक चेन, बिटकॉईन, क्रिप्टो करन्सी आदी शब्द ठळक चर्चेत आले आहेत. सुमारे साडेचार वर्षांपूर्वी बेळगाव परिसरातून एका हॅकरचे अपहरण करून त्याचा खून करण्यात आला होता. कुख्यात गुंड रशिद मलबारीवर या प्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. बिटकॉईन निमित्ताने हे खून प्रकरणही चर्चिले जात आहे.
एखादी कंपनी किंवा व्यक्तीच्या बँक खात्याला खिंडार पाडून त्या खात्यातील रक्कम दुसऱया खात्यात वळविण्याचे प्रकार जुनेच आहेत. काही हॅकर्स याचसाठी प्रसिद्ध होते. अंडरवर्ल्डमधील गुन्हेगारांनाही या नव्या गुन्हेगारी तंत्रज्ञानाचे आकर्षण स्वस्थ बसू देत नव्हते. आपण हॅकिंगमध्ये तरबेज असल्याचे सांगून कुख्यात गुंड मलबारीशी दोस्ती करणाऱया गोव्याच्या हॅकरचा त्याच्या मित्रासह साडेचार वर्षांपूर्वी खून झाला होता. या खून प्रकरणी बेळगाव येथील काही तरुणांना अटक झाली आहे. मात्र, प्रमुख गुन्हेगार रशिद मलबारी अद्याप फरारीच आहे.
आशिष रंजन (वय 36) हा मूळचा रांचीचा. वास्को-गोवा येथे त्याचे वास्तव्य होते. त्याचा आणखी एक मित्र अय्याज अहमद खान (वय 35) रा. काजूबाग, कारवार या दोघा जणांचा हॅकिंग प्रकरणातच खून झाला होता. 9 मार्च 2017 रोजी कारवार जिल्हय़ातील सुंकनाळनजीक आशिषचा तर 18 मार्च 2017 रोजी अरबैलनजीक अय्याज अहमदचा मृतदेह आढळून आला होता. यल्लापूर पोलिसात प्रकरणाची नोंद झाली आहे.
श्रीकृष्णा हा आंतरराष्ट्रीय पातळीवर कुख्यात झालेला हॅकर आहे. आशिष रंजनही एक हॅकर होता. तो मूळचा रांचीचा असला तरी बेळगाव, कारवार, हुबळी, गोवा परिसरात त्याचा वावर होता. खुनापूर्वी वास्को येथे त्याचे वास्तव्य होते. कोणत्याही बँकेतील एनजीओंच्या खात्याला खिंडार पाडून त्या खात्यातील रक्कम अन्य खात्यात वळवू शकतो, असा त्याचा दावा असायचा. याचसाठी कुख्यात गुंड रशिद मलबारीशी त्याची मैत्री झाली.
कोणत्याही बँक खात्यातील रक्कम करू शकतो, या त्याच्या दाव्यामुळे आशिष रंजनने रशिद मलबारीवर छाप पाडली होती. अशाच पद्धतीने हॅक केलेली 300 कोटीची रक्कम रशियातील आपल्या खात्यावर आहे. आपल्याला जर कोणी 40 लाख रुपये दिले तर त्याच्या खात्यावर आपण 1 कोटी ट्रान्स्फर करू शकतो, अशी भुरळ घालणाऱया आशिष रंजनला मुंबई येथील एक बिल्डर अस्लम व गुंड रशिद मलबारी यांनी 30 लाख रुपये दिले होते व रशिया येथील बँक खात्यातील रक्कम आपल्या खात्यावर वळविण्यास त्याला सांगितले होते. ही गोष्ट साध्य झाली नाही म्हणून 6 मार्च 2017 रोजी आशिष रंजन व अय्याज अहमद यांना बेळगावला बोलावून त्यांचे अपहरण करण्यात आले.
स्वतः रशिद मलबारी यावेळी बेळगावात होता. हिरेबागेवाडी, कित्तूर, बिडीमार्गे या दोघा जणांना यल्लापूर तालुक्मयात नेण्यात आले. बँक खात्यातून हॅक केलेली रक्कम आपल्या खात्यात ट्रान्स्फर करण्यासाठी त्यांच्यावर दडपण आणण्यात आले. ही गोष्ट तातडीने करण्यास आशिष रंजन असमर्थ असल्याचे लक्षात येताच त्याचा व त्याच्या मित्राचा खून करून मृतदेह टाकून देण्यात आले होते.
रशिद मलबारी सध्या फरारी
या प्रकरणात बेळगाव येथील तरुणांना अटक झाली आहे. तब्बल दीड ते दोन वर्षे बेळगाव येथे वास्तव्य केलेल्या रशिद मलबारीने या परिसरात अनेक गुन्हे केले आहेत. एनजीओंच्या खात्यातील रक्कम हॅक करण्याचा दावा आशिष रंजन व त्याच्या मित्राच्या जीवावर बेतला. बेंगळूरला उघडकीस आलेल्या प्रकरणामुळे सध्या जगभर बिटकॉईन व हॅकरची चर्चा सुरू आहे. मात्र, बेळगाव परिसरात साडेचार वर्षांपूर्वीच अशी घटना घडली होती. केवळ राजकीय पक्षांच्या नेत्यांनाच नव्हे तर तंत्रज्ञानाच्या मदतीने बँक खाती हॅक करून त्यामधील रक्कम दुसऱयांच्या खात्यात ट्रान्स्फर करण्याचे कसब अवगत असणाऱया हॅकर्सबद्दलचे आकर्षण पारंपरिक गुन्हेगारी जगतालाही आहे, हे यावरून दिसून येते. रशिद मलबारी सध्या फरारी आहे. त्याला अटक झाल्यानंतर हॅकर खून प्रकरणाविषयी आणखी माहिती उजेडात येणार आहे.
बिटकॉईन म्हणजे नेमके काय?
बिटकॉईन प्रकरणावरून सध्या कर्नाटकात राजकीय धूळवड सुरू आहे. बिटकॉईन म्हणजे नेमके काय? असा प्रश्नही सर्वसामान्य माणसांना पडला आहे. बिटकॉईन हे एक आभासी चलन आहे. एखाद्या डिजिटल वॉलेटमधील आभासी चलन दुसऱयाच्या वॉलेटमध्ये ट्रान्स्फर करता येते. ही सर्व प्रक्रिया ब्लॉक चेन या डिजिटल स्वरुपात चालते. बिटकॉईन कोणी कोणाला विकली किंवा कोणी कोणाकडून खरेदी केली, याची माहिती ब्लॉक चेनमध्ये दाखल होते. तंत्रज्ञानात तरबेज असणारा श्रीकृष्णा या बेंगळूर येथील तरुणाने आंतरराष्ट्रीय पातळीवर बिटकॉईन हॅकिंगचा घोटाळा केला असून या प्रकरणात राजकीय नेत्यांची नावेही चर्चेत आहेत. भाजप नेत्यांचा या घोटाळय़ात सहभाग असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे तर काँग्रेस नेते व त्यांची मुले यांचा श्रीकृष्णा याच्याशी संबंध असल्याचा आरोप करीत भाजपनेही पलटवार केला आहे. खरेतर गेल्या वर्षी श्रीकृष्णाला अटक झाली होती. एक वर्षानंतर हे प्रकरण सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजत आहे.