ऑनलाईन टीम / मुंबई :
देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकाळात राजकारणाचे गुन्हेगारीकरण केले. गुन्हेगारांना संरक्षण देत अंडरवर्ल्डशी संबंधित असलेल्या लोकांची त्यांनी सरकारी पदांवर वर्णी लावली. तसेच दाऊद इब्राहिम गँगसोबत संबंध असलेला रियाझ भाटी याच्यासोबत फडणवीसांचे चांगले संबंध आहेत. भाजपच्या प्रत्येक कार्यक्रमात तो दिसायचा. हे खोटे असेल तर फडणवीस यांच्या डिनर टेबलवर रियाझ भाटी कसा?, असा प्रश्न अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे.
मलिक म्हणाले, रियाझ भाटी हा 29 ऑक्टोबरला तो बनावट पासपोर्टमुळे सहारा विमानतळावर पकडला गेला. दाऊद इब्राहिम गँगसोबत त्याचे संबंध असल्याचे समोर आले होते. तरीही तो दोन दिवसांत सुटला. तो भाजपच्या प्रत्येक कार्यक्रमात आणि फडणवीसांच्या डिनर टेबलवर दिसायचा. मोदी पंतप्रधान आले असताना रियाझ भाटीने त्यांच्यासोबतही फोटो काढले. हे सगळे
फडणवीसांच्या आशिर्वादानेच घडते.
हैदर आझम बांगलादेशी लोकांना मुंबईत वसवण्याचं काम करतो. त्याची दुसरी बायको बांगलादेशी आहे. त्या व्यक्तीला फडणवीस यांनी मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचा अध्यक्ष कसा बनवला?, असा प्रश्नही मलिकांनी यावेळी उपस्थित केला.