अखिल भारत शाकाहार महासंघाचे आंदोलन
प्रतिनिधी /बेळगाव
अंडय़ांऐवजी अधिक सात्विक आणि पौष्टिक एकसमान शाकाहारी अन्न एकमताने वाटप करा. अन्यथा, संपूर्ण शाकाहार पाळणाऱया नवीन शाळा आणि अंगणवाडय़ा स्वतंत्रपणे सुरू करण्याच्या मागणीसाठी अखिल भारत शाकाहार महासंघाच्यावतीने सोमवार दि. 20 सकाळी 10 वाजता सुवर्ण विधानसौधवर मोर्चा काढण्यात येणार आहे. याकरिता चलो सुवर्णसौध मोर्चा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती दयानंद स्वामीजीनी दिली.
अखिल भारत शाकाहार महासंघाच्यावतीने रविवारी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी दयानंद स्वामीजीनी माहिती दिली. यावेळी चन्नबसवानंद स्वामीजी, संतराज जैन, शरण प्रसाद, महांतेश गुडस, जैन समाजाचे राजीव दोड्डण्णावर, के. बसवराव, अशोक भेंडीगेरी, आनंद गुडस व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
कर्नाटक सरकारकडे आपली मागणी मांडण्यासाठी हे आंदोलन छेडण्यात आले असल्याचे स्वामीजींनी सांगितले. शाळा हे विद्येचे मंदिर आहे, ते पवित्र स्थान आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनासाठी पाठवित असतो. पण या ठिकाणी विद्यार्थ्यांना अंडी वाटप करण्यात येत आहेत. हे त्वरित थांबविणे आवश्यक आहे. संपूर्ण राज्यात शाकाहारी पदार्थांचे समान वितरण व्हायला हवे. अंडय़ांऐवजी पौष्टिक एकसमान शाकाहारी अन्न वाटप करणे शक्मय नसेल तर लिंगायत धर्म, जैन, ब्राह्मण, वैश्य आदींच्या लाखो मुला-मुलींसाठी नवीन शाळा आणि अंगणवाडय़ा सुरू कराव्यात, अशी मागणी असल्याचे पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले.
या संदर्भात कर्नाटक सरकारला निवेदन देण्यासाठी संपूर्ण राज्यातील संत व विविध संघांच्यावतीने सुवर्णसौध चलो आंदोलन हाती घेण्यात आले आहे. त्यात हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित राहणार आहेत. पोषण आहाराच्या नावाखाली सरकारने आखलेल्या कुटिल धोरणामुळे शासकीय व अनुदानित शाळा, अंगणवाडय़ांतील लाखो निरपराध शाकाहारी धर्मातील बालके, ज्यांना स्वतःचे निर्णय घेता येत नाहीत, त्यांना वैचारिक क्षमताही मिळाली नाही, आकर्षण, लालसेने, लोभ आणि बळजबरीने सर्वांना मांसाहाराला प्रोत्साहन देण्यास भाग पाडण्याच्या या भयंकर सरकारी कृतीला विरोध असून या विरोधात हे आंदोलन हाती घेण्यात आले
आहे.
अनुदानित शाळांमध्ये अंडी खायला देण्याच्या शासकीय योजनेमुळे कर्नाटक राज्यातील 70 टक्क्मयांहून अधिक लिंगायत समाज, पूज्य मठ पीठाधीश आणि इतर समाजबांधव अडचणीत आले आहेत. त्यामुळे सरकारच्या विरोधात सर्व मठाधिपती उभे ठाकले आहेत. शासनाचे हे कुटील धोरण असून, याला आळा घालण्यासाठी परमपूज्य साधू, संत, महंत, मठ, पीठाधीश व सर्व शाकाहारी बांधवांनी, अनुदानित संस्थांनी विरोध दर्शविला असून शाकाहारी संस्कृती व धार्मिक परंपरांचे रक्षण करण्यासाठी हे आंदोलन छेडण्यात आले असल्याने सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.
प्रस्ताव केवळ 1 आठवडय़ात मागे
हे आंदोलन कोणत्याही सरकारी पक्षाच्या किंवा कोणत्याही मांसाहारी बांधवांविरुद्ध अजिबात नाही, ही बाब संघटनेच्यावतीने स्पष्ट करण्यात येत आहे. शाकाहारी लोकांची ही चळवळ आहे. एस. बंगारप्पा यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने 1991 मध्ये शाळांमध्ये अंडी वाटपाचा प्रस्ताव मंजूर केला, ज्यावर राज्यभर तीव्र विरोध झाल्याने हा प्रस्ताव केवळ 1 आठवडय़ात मागे घेण्यात आला.
अंगणवाडीत पौष्टिक आहार देण्याच्या नावाखाली 6 महिने ते 6 वर्षे वयोगटातील मुलांना उकडलेली अंडी देण्यात येत आहेत. शेंगदाणे, हरभरा इत्यादी इतर अनेक पौष्टिक पदार्थ उपलब्ध असूनही अंडी का? हा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. तसेच अंडी वितरणाचा फायदा कोणाला होतोय, यावर विचार करण्याची वेळ आली आहे. केवळ काही मंत्र्यांचे व त्यांच्या निकटवर्तीयांचे पोल्ट्रीफॉर्म चालविण्यासाठी सरकारकडून मध्यान्ह आहारात अंडी देण्याचा घाट घालण्यात आला आहे. त्यामुळे हा प्रस्ताव रद्द करावा, अशी मागणी आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे प्रधान दयानंद स्वामीजी यांनी दिली.