भगवंत उद्धवाला म्हणाले, सद्विद्या प्राप्त झाली की, संसारवृक्ष छेदून टाकणे शक्मय होते पण सदविद्येची प्राप्ती केवळ ईश्वराप्रति असलेल्या उच्च भावामुळेच होते. भाव तेथे देव असतोच असतो. ईश्वराप्रति भाव जडण्यास त्रिगुणांचा मोठाच अडथळा असतो कारण त्रिगुणाचे सूत्र लागून जीवाला जीवपण आलेले असते. ते तीन गुण अंगांत आहेत तोपर्यंत सद्विद्या उत्पन्नच होत नाही. आता हे त्रिगुण कसे बाजूला करायचे तेही सांगतो. सत्त्व, रज आणि तम हे तीन बुद्धीचे म्हणजे मायेचे गुण आहेत, आत्म्याचे नव्हेत, सत्त्वगुणाने रज आणि तमाचा नाश करावा यासाठी प्रेमाने सत्त्व वाढवले की, रज आणि तम ही पूर्णपणे नाश पावतात तसेच सद्विद्या हाती लागून आत्मस्वरूपाचा बोध झाला की, सत्वाची झालेली वाढही मोडून जाते. रजाचा आणि तमाचा लोप होऊन सत्त्व वाढते हे खरे, पण तेच वाढलेले सत्त्व, सर्व कर्मापासून व कार्यापासून मी अगदी अलिप्त आहे. ज्ञाता तो मी, अत्यंत सुखी काय तो मी, अशा कल्पनेच्या भराऱया मारू लागतो. त्यामुळे स्वतःच उघडलेल्या सापळय़ात सत्वगुणी माणूस स्वतःहून अडकतो. मग भले सापळा सोन्याचा का असेना! या वाढलेल्या सत्त्वगुणाचे महत्त्व आत्मतत्त्वानेच कमी केले पाहिजे. त्याचे विवरण तुला सविस्तर सांगतो. सत्व, रज, तम या तीन गुणांची साम्यावस्था असलेला मनुष्य ईश्वराला प्रिय असतो. विशेष म्हणजे मनुष्य जन्माला आला असताना हे तीन गुण साम्यावस्थेतच असतात. म्हणून लहान मुले सर्वांना प्रिय असतात पण मनुष्य जसजसा मोठा होत जातो तसतशी त्याची स्वार्थी वृत्ती वाढत जाते आणि त्या प्रमाणात रज आणि तमोगुण सत्वापेक्षा वरचढ ठरतात. तमोगुण वाढला असता त्याला सत्वगुण युक्त असलेले ज्ञान-ध्यान आवडत नाही, त्याग आवडत नाही तसेच रजोगुण युक्त असलेले चंदनादि सुखविलासही आवडत नाहीत. झोप किंवा दांडगा कलह मात्र आवडू लागतो. रजोगुण वाढला तर ज्ञानाचे निरूपण ऐकत असताही त्याचे मन भोगाविषयी आसक्त असते. त्याला सदासर्वदा विषयाचेच ध्यान लागलेले असते. धनलोभामुळे त्याचा कोणी अपमान केला तरी त्याला राग येत नाही तसेच रजोगुणी मनुष्य स्त्रीपुत्रांविषयी फार लोभी असतो. सत्वगुण वाढला असता भोगाविषयी तो उदासीन होतो. निरंतर भगवच्चिंतन करितो किंवा कीर्तन अथवा हरीची भक्ति करितो. क्रोध, लोभ किंवा मोह ह्यांचे लक्षण सत्त्वाच्या कालात उत्पन्न होत नाही. माणसाचा सत्वगुण वाढला असता माझ्या भक्तिरूप धर्माची वाढ होते. सात्वीक पदार्थांचे सेवन केले असता सत्त्व गुण वाढतो आणि त्यामुळे धर्माकडे प्रवृत्ती होते. सत्त्ववृद्धीमुळे जीवही पवित्र होतो. सत्त्वाच्या उत्कर्षाचे लक्षण म्हणजे धर्मनि÷ा व स्वधर्माचे आचरण हे होय. त्याचप्रमाणे वासनांचे बंधनही त्याला नको असते. अंतःकरण शुद्ध झाले असता सत्त्वगुण अमर्याद वाढतो आणि माझ्या भक्तीचे लक्षण म्हणजे धर्मप्रवृत्ती वाढते. धर्माची प्रवृत्ति वाढली असता गुरुभजनावर अत्यंत प्रेम जडते किंवा माझ्या मूर्तीच्या ठिकाणी भक्ति उल्हास पावते. कायिक, वाचिक आणि मानसिक कर्म तो सहजी मला अर्पण करतो. माझ्याशिवाय इतरांची भक्ती त्याच्या ठिकाणी उत्पन्नच होत नाही. गुरु आणि भगवंत हे भिन्न नव्हेत हे त्याला स्पष्ट जाणवू लागते. तेच अत्यंत थोर सत्त्वाचे लक्षण होय. सत्त्वगुणाची वाढ हाच श्रे÷ धर्म होय कारण तो रज आणि तम यांचा नाश करतो. रज आणि तम नष्ट झाले असता त्यांच्यामुळे उत्पन्न होणारा अधर्मसुद्धा ताबडतोब नष्ट होतो. असे सात्वीक धर्म वाढले असता, सत्त्वामध्येच मुमुक्षूंचे विश्रांतीस्थान असलेला पुरुषोत्तम प्रगट होतो.
अशा प्रकारे सत्त्ववृत्तीत जो धर्म वाढतो, तोच अधर्माचा तत्काळ नाश करतो. कारण अधर्माचे मूळ असलेल्या रजोगुण आणि तमोगुणाचा तो समूळ नाश करतो.
सात्वीक पदार्थाच्या सेवनाने सत्त्वाची वृद्धी होते. आता सत्वगुण कशामुळे वाढतो तेही ऐक. शास्त्र, पाणी, प्रजा, देश, काळ, कर्म, जन्म, ध्यान, मंत्र आणि संस्कार ही दहा सत्वगुणांच्या वाढीची कारणे होत.
क्रमशः