पंतप्रधान मोदी यांचा दावा- इंडियन स्पेस असोसिएशन लॉन्च
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सोमवारी इंडियन स्पेस असोसिएशनची सुरुवात केली. यावेळी अंतराळ उद्योग क्षेत्राशी संबंधित प्रतिनिधींशी संवाद साधताना 130 कोटी देशवासियांच्या प्रगतीसाठी भारतीय अंतराळ क्षेत्र हे एक उत्तम माध्यम असल्याचे सांगितले. सामान्य माणसांसाठी अंतराळ क्षेत्रामध्ये उत्तम मॅपिंग, इमेजिंग आणि कनेक्टिव्हिटी सुविधा उपलब्ध करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. इंडियन स्पेस असोसिएशनच्या माध्यमातून नजिकच्या काळात अंतराळ क्षेत्रात चांगल्या संधी उपलब्ध होणार असल्याचेही ते म्हणाले.
भारताने कार्यक्षमतेला ब्रँडचा अविभाज्य भाग बनवले आहे. अंतराळ संशोधनातही भारत पुढे असून आता इंडियन स्पेस असोशिएशनच्या माध्यमातून नवतरुणांना संधीचे द्वार खुले होत असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. 21 व्या शतकात जगाला जोडण्यात अंतराळ महत्वाची भूमिका बजावेल, असेही ते पुढे म्हणाले. याप्रसंगी त्यांनी जयप्रकाश नारायण आणि नानाजी देशमुख यांच्या आठवणी आणि कार्यालाही उजाळा दिला. एअर इंडियाबाबत घेतलेला निर्णय आमची बांधिलकी आणि गांभीर्य दर्शवतो. उपग्रह ट्रकिंगसह गरिबांसाठीची घरे, रस्ते आणि इतर पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये भारताची आजवरची कामगिरी अव्वल राहिली आहे. तसेच जगातील अव्वल डिजिटल अर्थव्यवस्थेतही भारत पुढे आहे. एंड टू एंड टेक्नॉलॉजी असलेल्या काही मोजक्मया देशांपैकी भारत हा एक देश असल्याचेही त्यांनी नमूद केले.
इंडियन स्पेस असोसिएशनच्या संस्थापक सदस्यांमध्ये लार्सन अँड टुब्रो, नेल्को (टाटा ग्रुप), वनवेब, भारती एअरटेल, मॅपमायइंडिया, वालचंदनगर इंडस्ट्रीज, अनंत टेक्नॉलॉजी लिमिटेड यांचा समावेश आहे. तसेच इतर सदस्यांमध्ये गोदरेज, अजिस्टा-बीएसटी एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड, बीईएल, सेंटम इलेक्ट्रॉनिक्स आणि मॅक्सर इंडिया यांचा समावेश आहे.
भारत नव्या कल्पनांचे जागतिक केंद्र
आत्मनिर्भर भारत मोहीम ही केवळ एक दृष्टी नाही तर एक विचारशील, सुनियोजित, एकात्मिक आर्थिक धोरण आहे. भारतातील उद्योजक आणि तरुणांची कौशल्यक्षमता वाढविण्यासाठी आणि त्यांना जागतिक पातळीवरून झळकण्यासाठी विशेष रणनीतीची गरज आहे. त्यानुसार आत्मनिर्भार भारत मोहीम सुरू करण्यात आली असून आता भारत हा नवकल्पनांचे जागतिक केंद्र बनत आहे, असे ते म्हणाले.
इस्रोच्या मोहिमांना कोरोनामुळे विलंब
देशाने गेल्या काही वर्षांत अंतराळ संशोधन क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशननेही (इस्रो) अनेक यशस्वी प्रक्षेपणे केली आहेत. तथापि, कोरोनामुळे इस्रोच्या काही अंतराळ मोहिमांना विलंब झाला आहे. देशातील पहिली सौर मोहीम 2022 च्या तिसऱया तिमाहीत सुरू होण्याची शक्मयता आहे. तसेच भारताची दुसरी अवकाश संशोधन वेधशाळा ‘एक्स्पोसॅट’ देखील पुढील वर्षी सुरू होणार आहे. त्याचबरोबर गगनयान मिशन 2022 च्या अखेरीस किंवा 2023 च्या सुरुवातीला सुरू होण्याची शक्मयता आहे.