अध्याय पंधरावा
भगवंतांची सूक्ष्म, महान, हलकी अशी जी रूपे आहेत त्या त्या रुपांवर जो लक्ष केंद्रित करेल तशा सिद्धी त्याला प्राप्त होतात. सिद्धी म्हणजे आपल्या मनासारख्या गोष्टी घडवून आणण्याची क्षमता. भक्त जेव्हढं म्हणून भगवंतांचं ध्यान करतो तितक्मयाप्रमाणात तो त्यांच्याशी एकरूप होत जातो आणि आपोआपच त्यांना सहज भावाने प्राप्त असलेल्या सिद्धी भक्तालाही प्राप्त होतात. आत्तापर्यंत भगवंतांनी उद्धवाला, त्यांच्याकडे असलेल्या अष्टसिद्धीपैकी आणिमा, लघिमा, महिमा, प्राप्ती आणि प्रकाम्य या सिद्धी कशा प्राप्त होतात ते सांगितलं. पुढे म्हणाले, जे महत्तत्त्व आहे, तेच मायेचे पहिले स्फुरण होय असे समज. ह्यालाच ‘सूत्रप्रधान क्रिया’ असे नाव दिलेले आहे. त्यात मी स्वतः जन्मरहित असूनही त्या सूत्राचा सूत्रात्मा झालो आहे. त्या माझ्या स्वरूपाचे जो सावध चित्ताने ध्यान करतो
त्याला, ब्रह्मांड व हिरण्यगर्म ही प्रकाशमान करणारी प्रकाशकताच वश होते. त्या निदिध्यासातच तो कोटी ब्रह्मांडे निर्माण करू शकतो. इतकी ही उत्तम प्रकाशसिद्धी साधकांना माझ्यामुळे प्राप्त होते. त्रिगुणात्मक मायेचा स्वामी असलेल्या माझ्या या कालशरीर विष्णुस्वरूपामध्ये जो चित्ताची धारणा करेल, त्याला ‘ईशित्व’ सिद्धी प्राप्त होते. त्यामुळे त्याला जीवांना व त्यांच्या शरीरांना प्रेरणा देण्याचे सामर्थ्य प्राप्त होते. माया आदिकरून त्रिगुणांचा जो नियंता, जो कळिकाळाला आकलन करणारा, उत्पत्ती, स्थिती व लय करणारा आणि जो खरोखर अंतःकरणांत वास करणारा अशा विष्णूचे जो निरंतर ध्यान करतो, त्याला ईशत्व प्राप्त झाल्याने अदृश्य वस्तु पाहाण्याचेही सामर्थ्य प्राप्त होते. बुद्धिबळाच्या मिथ्या खेळामध्ये खेळणारा मनुष्य त्यांतील मोहऱयांच्या स्वारीची गती बरोबर समजून घेतो, त्याप्रमाणे संसाराचा अनुभव मिथ्या असला तरी जीवांचे जाणेयेणे तो स्वतः समजू शकतो. तो जीव इत्यादि शरीराच्या प्रेरणा आपण स्वतः करू शकतो. याप्रमाणे अंतर्यामी नारायणाचे ध्यान केले असता एवढी सिद्धी प्राप्त होते, हे लक्षात ठेव. तो आपल्या प्रतापसामर्थ्याने मशकाकडून मेरुचेसुद्धा तुकडे करून टाकतो. एखाद्या दुर्बलाच्या हातूनसुद्धा तो सृष्टीचा विध्वंस करवून पुनः तिची रचना करवितो किंवा उंदराच्या हातानेसुद्धा इंद्राला ठार करवितो! अशाप्रकारे एखाद्याला ठार करतो, एखाद्याचा जीव गेला असला तर त्याला पुन्हा जिवंत करतो व अचेतनालाही सचेतन करून सोडतो. असे ईशित्व (ईश्वरत्व ) प्राप्त होणे हे या सिद्धीचे माहात्म्य आहे. विराट, हिरण्यगर्भ व कारण या तीन उपाधींनी रहित म्हणून ‘तुरीय’ व सहा ऐश्वर्यांनी संपन्न म्हणून भगवान अशी ज्यांना नावे आहेत, त्या माझ्या नारायणस्वरूपामध्ये जो योगी मनाची धारणा करतो, त्याचे ठिकाणी माझे गुण येतात असा योगी ‘वशिता’ नावाची सिद्धी प्राप्त करून घेतो. जीव, शिव आणि प्रकृती, ह्यांहून पलीकडची जी चौथी स्थिती आहे, जिला, ज्ञाते ‘नारायण’ असें म्हणतात. त्याचप्रमाणे जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती ह्यांहून भिन्न जी तुरीयावस्था, तिलाही ज्ञाते लोक ‘नारायण’ असेच म्हणतात. दृश्य, द्रष्टा आणि दर्शन ह्यांहून पलीकडचा जो चौथा पुरुष त्यालाही ज्ञाते लोक स्वानुभवाने नारायण असे म्हणतात.
जी वस्तु त्रिपुटीच्या आत असूनही त्रिपुटीहुन भिन्न आणि जो त्रिपुटीला अलिप्त असणारा तो मी सुप्रसिद्ध नारायण होय. यश, श्री, वैराग्य, ज्ञान, ऐश्वर्य आणि औदार्य हे सहा गुण ज्याच्यामध्ये परिपूर्णत्वेकरून निरंतर वास करतात, त्या नारायण भगवंताचे म्हणजे माझे ध्यान केले असता माझी ‘वशिता’ नामक सिद्धी प्राप्त होते. सर्व कर्मात असून तो अलिप्त राहतो व सर्व भोग भोगून तो अभोक्ता असतो.
ज्या योग्याचे मन स्वच्छ होऊन निर्गुण ब्रह्म अशा माझ्या ठायी स्थिर झाले आहे, त्याला परमानंद प्राप्त होतो. या स्थितीत त्याला कोणत्याही प्रकारची कामना नसते. हिला ‘कामावसायिता’ नावाची सिद्धी म्हणतात.
क्रमशः