बजाज फिनसर्व्ह सर्वाधिक नफ्यात : घसरणीला अखेर विराम
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवडय़ात मागील सलग सहा सत्रात शेअर बाजाराची कामगिरी घसरणीत राहिल्याचे पहावयास मिळाले होते. परंतु अंतिम दिवशी शुक्रवारी मात्र शेअर बाजारात सेन्सेक्स 835 अंकांनी मजबूत होत तेजीची उसळी नोंदवत बंद झाल्याचे पहावयास मिळाले आहे.
दिवसभरात प्रमुख कंपन्यांच्या कामगिरीच्या जोरावर सेन्सेक्स दिवसअखेर 835.06 अंकांनी वधारुन निर्देशांक 37,388.66 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 244.70 अंकांनी मजबूत होत 11,050.25 वर स्थिरावल्याचे पहावयास मिळाले आहे. सदर कामगिरीत जवळपास 1953 समभाग तेजीसोबत बंद झाले असून यातील 648 समभाग घसरणीसह बंद झाले आहेत. तर 165 समभागांच्या भावात कोणत्याही प्रकारचा बदल झाला नसल्याचे दिसून आले आहे.
प्रमुख कंपन्यांपैकी निफ्टीमध्ये बजाज फिनसर्व्ह, इंडसइंड बँक, भारती एअरटेल, सिप्ला आणि एचसीएल टेक्नॉलॉजीचे समभाग हे सर्वाधिक नफ्यात राहिले आहेत. तर स्टेट बँक, लाईफ इन्शुरन्स, युपीएल, एचडीएफसी लाईफ आणि बीपीसीएल यांचे समभाग सर्वाधिक नुकसानीत राहिले आहेत.
मागील सहा सत्राच्या प्रवासातील घसरणीच्या प्रभावामुळे गुंतवणूकदारांचे तब्बल 11 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिकचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आल्याची माहिती तज्ञांकडून देण्यात आली आहे.
दोन मोठय़ा घसरणींची नोंद
चालू आठवडय़ात दोन मोठय़ा घसरणीची नोंद भारतीय शेअर बाजारात झाली आहे. गुरूवारनंतर शुक्रवारी काय होणार याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागून राहिले होते. परंतु यातून सावरत शेअर बाजार अंतिम दिवशी शुक्रवारी तेजीची उसळी घेत बंद झाल्याचे दिसून आले. प्रारंभीच्या काळात बीएसई सेन्सेक्स 438.29 अंकांच्या तेजीसोबत 36,991.89 वर तर निफ्टी 100 च्या वरती जात 10,910.40 वर खुला होत प्रारंभ झाल्याची नोंद करण्यात आली आहे.