वृत्तसंस्था/ ख्राईस्टचर्च
येथे सुरू असलेल्या आयसीसी महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत रविवारी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम सामना खेळविला जाणार आहे. या सामन्यासाठी आयसीसीच्या आंतरराष्ट्रीय पंच पॅनेलमधील भारताची जी. एस. लक्ष्मी सामनाधिकारी म्हणून कार्यरत राहील.
2020 च्या डिसेंबरमध्ये संयुक्त अरब अमिरातमध्ये झालेल्या विश्वचषक लीग-2 पुरुषांच्या क्रिकेट स्पर्धेत भारताची महिला पंच जी. एस. लक्ष्मीने पंचगिरी केली होती. पुरुषांच्या वनडे क्रिकेट सामन्यात पंचगिरी करणारी जी. एस. लक्ष्मी ही भारताची पहिली महिला पंच ठरली आहे. महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय महिला संघाला बाद फेरीत प्रवेश मिळविता आला नाही. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन संघांनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य लढतीत ऑस्ट्रेलियाने विंडीजचा तर इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. या अंतिम सामन्यासाठी दक्षिण आफ्रिकेची लॉरेन ऍजेनबग आणि न्यूझीलंडची किम कॉटन या मैदानावरील पंच राहतील. विंडीजची जॅक्वेलिन विल्यम्स ही टीव्ही पंच म्हणून राहील.