कोल्हापूर शहरासाठी पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता : लाकूड, शेणी मुबलक मिळण्याची शक्यता कमी
सुधाकर काशीद / कोल्हापूर
कोरोना संसर्गामुळे वाढलेले मृत्यूचे प्रमाण व अंत्यविधीसाठी लाकूड व शेणीचा अपुरा साठा या पार्श्वभूमीवर आता लाकूड व शेणी देणगी देण्याचा उपक्रम सुरू असला तरीही अंत्यविधीसाठी पर्यायी व्यवस्थेची गरज निर्माण झाली आहे. सध्या पर्याय म्हणून एक गॅसदाहिनी असली तरीही आणखी गॅस व विद्युतदाहिनीची पंचगंगा स्मशानभूमीला आवश्यकता भासू लागली आहे. आणि आत्ताच त्याची उभारणी करावी लागणार आहे. कोल्हापूरच्या पश्चिम भागात जरूर जंगलझाडी आहे. इकडूनतिकडून अंत्यविधीसाठी लाकूडफाटा जमा करणे शक्य आहे. पण हा कायमस्वरूपी उपाय नाही हे समजून घेण्याची गरज आहे.
आता कोरोना संसर्गाच्या काळात मृत्युसंख्येत वाढ होत आहे. हेच प्रमाण कायम राहील अशी स्थिती नाही. पण अंत्यविधीसाठी येथून पुढे लाकूड-फाटा मुबलक मिळण्याची शक्यता कमी होणार आहे. त्यासाठी वृक्षतोड अटळ आहे. त्यामुळे आहे ती परंपरागत पद्धत चालू ठेवतानाच गॅस व विद्युतदाहिनीच्या पर्यायाची आवश्यकता आहे. बदलत्या परिस्थितीत हा पर्याय स्वीकारण्याची कोल्हापूरकरांची मानसिकता आहे. त्यामुळे परंपरागत पद्धत चालू राहताना गॅस व विद्युतदाहिनी सुरू राहिल्याने लाकडाची गरज व पर्यायाने वृक्षतोड कमी होणार आहे.
पंचगंगा स्मशानभूमीत प्रत्येक मृतदेहासाठी 150 किलो लाकूड व 500 शेणी वापरल्या जातात. मृतदेहावर लाकूड व शेणी रचण्याची पद्धत वायुविजनाला पुरक असल्याने पंचगंगा नदीवरून येणाऱया वाऱयाचा जोर सतत अग्नाग फुलवत राहतो. त्यामुळे सात ते आठ तासांत मृतदेहाची राख होते. ही राख नदीत न सोडता शेतीसाठी खत म्हणून वापरली जाते.
दहनासाठी लाकूड व शेणीशिवाय गॅसदाहिनीचा पर्याय गेल्या वर्षापासून सुरू झाला आहे. पण त्याचा वापर सातत्याने होत नाही. नातेवाईकही आपल्या संबंधिताच्या मृतदेहावर लाकूड या परंपरागत पद्धतीने दहन करण्याचा आग्रह धरतात. त्यामुळे लाकूड व शेणीचाच वापर अधिक होतो.
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या सर्वांच्यावर पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जात आहेत. रोज सरासरी 20 ते 25 मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जातात. या मृतदेहाचे दहन सहा तासात होईल इतके लाकूड व शेणी वापरले जाते. त्यामुळे लाकूड व शेणीचा तुटवडा जाणवू लागला आहे. आसपासच्या भागातून व्यक्ती, संघटना, संस्था, लाकूडदान करताहेत. बुधवारी तर गगनबावडा तालुक्यातील 14 गावातून 14 ट्रॉली भरून लाकूड दिले गेले. आता लाकडाचा पुरवठा जरूर होत आहे. पण भविष्यात कधीतरी झाडे तोडणे, लाकडावर मर्यादा येणार आहे. त्यामुळे आत्ताच पर्याय उभे करणे काळाची गरज आहे. परंपरा जपताना नव्या बदलाला सामोरे जाण्याची मानसिकता तयार करण्यासाठी कोल्हापुरातील ज्येष्ठ धुरिण पुढे आले तर ते शक्य होणार आहे.
सध्या शहरातील पंचगंगा, कसबा बावडा, कदमवाडी व बापट कॅम्प या चार स्मशानभूमीसाठी मिळून 500 टन लाकूड लागते. त्याचा खर्च 16 ते 17 लाख रुपये आहे. तसेच 25 लाख शेणी लागतात त्याचा खर्च 14 ते 15 लाख रुपये आहे. धोरणामुळे लाकूड व शेणीची आवश्यकता अधिक भासू लागली आहे. – अरविंद कांबळे, आरोग्य निरीक्षक स्मशानभूमी |