बिहारमध्ये संवेदनहीनता दर्शविणारी घटना
वृत्तसंस्था/ अररिया
बिहारच्या अररिया जिल्हय़ातील मधुलता गावात कोरोनामुळे वीरेन मेहता आणि त्यांच्या पत्नी प्रियंका देवी यांचा मृत्यू झाला असता गावातून कुणीच त्यांना खांदा देण्यास पुढे आला नाही. अखेर त्यांची मुलगी सोनीने अंत्यसंस्कारासाठी पैसे नसल्याने सरपंचाच्या मदतीने एकटय़ानेच आईच्या मृतदेहाला पुरले होते. पण जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या मदतनिधीतून मुलीने आईवडिलांचे मृत्यूपश्चात विधी पूर्ण करण्याचा निर्णय घेतला असता गावातील 150 पेक्षा अधिक लोक जेवणासाठी पोहोचले.
गावात वैद्य म्हणून काम करणाऱया वीरेन मेहता यांचा कोरोना संक्रमणामुळे मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूच्या 4 दिवसांनी त्यांची पत्नी प्रियंका देवी यांचा मृत्यू ओढवला होता. अशावेळी नातलगांनी अंत्यसंस्कारात भाग घेण्यास नकार दिला होता. वीरेन यांच्या मुलीने शेजाऱयांना मृतदेहाला खांदा देण्याची आणि स्मशानापर्यंत पोहोचविण्याची विनवणी केली असता सर्वांनी तोंड फिरविले होते. अशा स्थितीत मुलगी सोनीने पीपीई किट घालून स्वतःच्या आईच्या मृतदेहाला एका खड्डय़ात पुरले होते. या घटनेचे छायाचित्र देशविदेशातील प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले होते.
आर्थिक तंगीत आईला दफन करतानाचे छायाचित्र प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध होताच प्रशासनाकडून सोनीला 4 लाख रुपयांची मदत करण्यात आली होती. याची माहिती कळताच ग्रामस्थांनी आईवडिलांचे पूर्ण विधी करण्याची सूचना सोनीला केली होती. खांदा द्यायला कुणीच न आलेल्या गावातून सुमारे 150 जण तेराव्याचे जेवण करण्यासाठी पोहोचले होते.