उर्वरित केशरी रेशनकार्डबाबत अद्याप निर्णय नाही, 10 एप्रिलनंतर वाटप होणार सुरु
कृष्णात चौगले/कोल्हापूर
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात जाहीर केलेले ‘लॉकडाऊन’ आणि राज्यभरात लागू करण्यात आलेल्या संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत केंद्रसरकारने मोफत धान्य देण्याचे जाहीर केले. यामध्ये केवळ प्राधान्य गट आणि अंत्योदय योजनेतील रेशनकार्डधारकांना एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी प्रति महिना, प्रति सदस्य 5 किलो मोफत तांदूळ वितरित करण्याचा निर्णय राज्यसरकारने 31 मार्च रोजी घेतला आहे. उर्वरित केशरी शिधापत्रिकाधारकांना मोफत धान्य देण्याबाबत शासन पातळीवर चर्चा सुरु असली तरी अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कावितके यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना दिली.
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्यात 23 ते 31 मार्चपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली. त्यानंतर केंद्र शासनामार्फत 14 एप्रिलपर्यंत देशभरात ’लॉकडाऊन’ जाहीर करण्यात आले. ‘लॉकडाऊन’च्या परिस्थितीत गरिबांची उपासमार होऊ नये, तसेच कोणतीही व्यक्ती अन्नधान्यापासून वंचित राहू नये, यासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांसाठी एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीत लाभार्थी कुटुंबातील प्रत्येक सदस्याला 5 किलो मोफत धान्य वितरित करण्याचा आदेश केंद्र शासनमार्फत राज्य शासनाला देण्यात आला. त्यानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत राज्यातील प्राधान्य आणि अंत्योदय शिधापत्रिकाधारकांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला 5 किलोप्रमाणे मोफत तांदूळ वितरित करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने घेतला. यामध्ये उर्वरित केशरी शिधापत्रिकाधारक लाभार्थीना मोफत धान्य वितरणाबाबत शासनाने कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे मोफत धान्य वितरणाच्या मुद्यावरून राज्यातील शिधापत्रिकाधारकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रक कावितके यांनी मोफत धान्य वितरणाबाबत प्रशासनाच्यावतीने भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, नियमित धान्य वितरण प्रणालीनुसार 1 एप्रिलपासून 2 रूपये किलो प्रमाणे गहू व 3 रूपये किलोप्रमाणे तांदूळ वितरण सुरु आहे. येत्या चार दिवसात हे धान्य वाटप पूर्ण होईल. त्यानंतर मोफत धान्य वितरण निर्णयानुसार पुन्हा याच रेशनकार्डधारकांना (अंत्योदय व प्राधान्य) नोंदीत युनिटनुसार कार्डवरील प्रत्येक लाभार्थ्यास 5 किलो तांदूळ मोफत दिला जाणार आहे. यासाठी शासनाकडून सुमारे 40 टक्के तांदूळसाठा शासकीय गोदामामध्ये पोहोच झाला आहे. तर उर्वरित साठा गोदामाकडे पाठविण्याचे काम शासनाकडून युद्धपातळीवर सुरु आहे. सध्या प्राप्त तांदूळ रेशन दुकानांकडे पोहोचवला जात आहे. 10 एप्रिलपर्यंत मोफत वितरण प्रणालीमधील सर्व धान्य रेशन दुकानांकडे प्राप्त झाल्यानंतर लाभार्थ्यांना वाटप सुरु केले जाईल. या धान्याचे वितरण पारदर्शकपणे होण्यासाठी त्याचीही ऑनलाईन नोंदणी होणार असल्याचे कावितके यांनी स्पष्ट केले.
उर्वरित ‘केशरी’ला धान्य देण्याचा निर्णय झाल्यास यंत्रणेवर येणार ताण
प्राधान्य व अंत्योदय रेशनकार्डवरील प्रत्येक सदस्याला प्रति महिना 5 किलो धान्य दिले जाते. यासाठी महिन्याला जिह्यात 12 हजार टन धान्याचे वितरण केले जाते. आता याच लाभार्थ्यांना मोफत धान्याचे वितरण केले जाणार आहे. यासाठी पुन्हा 12 हजार टन धान्याचे प्रशासनाकडून वितरण सुरु आहे. त्यामुळे शासनाने उर्वरित केशरी रेशनकार्डधारकांना धान्य देण्याचा निर्णय घेतल्यास वितरण व्यवस्थेतील उपलब्ध यंत्रणेवर मोठा ताण येणार आहे. तसेच शासकीय धान्य गोदामांसह रेशन दुकानांमध्ये धान्य ठेवण्यासाठी जागा उपलब्ध होणार नाही. त्यामुळे हा निर्णय झाल्यास प्रशासनाला पर्यायी व्यवस्था उपलब्ध करावी लागणार आहे.
‘सोशल डिस्टन्स’ राखून पारदर्शकपणे धान्य वितरण करा
शासन निर्णयानुसार प्राप्त धान्य लाभार्थ्यांना मोफत वितरण करताना रेशन दुकानदारांनी त्यामध्ये पारदर्शकपणा ठेवावा. वितरण करताना दुकानदारांनी स्वतःचीही काळजी घ्यावी. गर्दी टाळून सॅनिटायझर, मास्कचा वापर करावा. लाभार्थ्यांकडून कोणतीही तक्रार येऊ नये, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कावितके यांनी केले.