नैऋत्य मोसमी वारे शुक्रवारपर्यंत अंदमान बेटांवर दाखल होणार
नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून येत्या शुक्रवार (21 मे) पर्यंत अंदमानात दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. दुसरीकडे बंगालच्या उपसागरात 23 मेच्या आसपास कमी दाबाच्या क्षेत्राचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे. दरम्यान, अरबी समुद्रातील ‘तौक्ते’ चक्रीवादळ गुजरात किनारपट्टीला धडकले असून, त्यानंतर त्याची तीव्रता कमी झाली आहे. हे वादळ 20 मेपर्यंत राजस्थानमार्गे पश्चिम उत्तर प्रदेशकडे वळेल, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
सर्वसाधारणपणे मान्सून 20 ते 22 मेपर्यंत अंदमानात दाखल होतो. हवामान विभागाने 21 मेपर्यंत मान्सून अंदमानात दाखल होण्याची शक्यता वर्तविली होती. अंदमानात सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे मान्सून दक्षिण अंदमानच्या समुद्रात शुक्रवारपर्यंत दाखल होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. दरम्यान, 31 मेपर्यंत मान्सून केरळात दाखल होणार असल्याचेही हवामान विभागाने यापूर्वी सांगितले आहे.