100 कि.मीपर्यंत करता येतो प्रवास : नुतनीकरणासाठीही गर्दी
प्रतिनिधी /बेळगाव
अनलॉकनंतर राज्यांतर्गत बससेवा पूर्वपदावर आली आहे. त्यामुळे परिवहनकडून दिल्या जाणाऱया बसपासला मागणी वाढली आहे. ज्येष्ट नागरिक व दिव्यांग व्यक्तींना वर्षभराच्या कालावधीसाठी सवलतीच्या दरात बसपासचे वितरण केले जाते. या बसपासच्या मागणीसाठी मागील काही दिवसांपासून विभागीय संचार कार्यालयात संबंधित व्यक्तींची वर्दळ वाढली आहे. दिव्यांग, अंध, स्वातंत्र्य सैनिकांच्या विधवा पत्नी, गोवा चळवळीतील व्यक्ती, हुतात्म्यांच्या पत्नी, वीरमाता आदींना परिवहनमार्फत सवलतीच्या दरात बसपास उपलब्ध करून दिले जातात. या बसपासच्या नुतनीकरणासाठीही गर्दी होत आहे.
अंध, दिव्यांग आणि ज्येष्ट नागरिकांचा प्रवास सुखकर व्हावा आणि त्यांना सन्मानाने जगता यावे, याकरिता परिवहनकडून अल्पदरात बसपास उपलब्ध करून दिला जातो. अशा व्यक्तींना वर्षभरासाठी केवळ 660 रुपयात बसपास दिला जातो. दरवषी हा बसपास नुतनीकरण करून पुन्हा वापरता येतो. यासह 60 वर्षांवरील ज्येष्ट नागरिकांसाठी 40 टक्के तिकीट दरात सूट देण्यात येते. दर बुधवारी विभागीय संचार कार्यालयात बसपासचे अर्ज स्वीकारले जातात. मागील दोन वर्षात कोरोनामुळे ज्येष्ट नागरिक, अंध, दिव्यांग व्यक्तींनी बसपास घेण्याकडे पाठ फिरविली होती.
मात्र आता बससेवा विविध मार्गांवर सुरळीतपणे सुरू झाल्याने बसपासला मागणी वाढली आहे. राज्यांतर्गत बससेवेबरोबरच राज्याबाहेरही काही प्रमाणात बस धावत असल्याने बसपासचा संबंधितांना लाभ होत आहे. या बसपासच्या आधारे 100 किलो मीटरपर्यंत प्रवास करता येतो. त्यामुळे अंध, दिव्यांग आणि ज्येष्ट नागरिकांसाठी सवलतीच्या दरात मिळणारा बसपास आधार ठरताना दिसत आहे.