गरीब कुटुंबातील विवाहांसाठी मंडळाचा पुढाकार, ताराबाई रोडवरील हॉलमध्ये मोफत लग्नकार्य : मर्यादित व्हराडी मंडळींसाठी गोड-धोड जेवणाचीही सुविधा
संग्राम काटकर/कोल्हापूर
प्रत्येक आई वडिलांची आपल्या मुलाचा, मुलीचा विवाह थाटात करण्याची इच्छा असते. पण अनेकांची ही इच्छा बेताची परिस्थिती आणि गगनाला भिडलेल्या महागाईमुळे पूर्ण होत नाही. मंगल कार्यालयात विवाह करायचा झाल्यास त्याचे भाडे ऐकुणच आई वडिल शांत होतात. शिवाय मानपानापासून ते आहेर, सोन्याचे दागिने, जेवण याचा खर्च करताना तारांबळ होते. अशा परिस्थितीत त्यांचा आर्थिक भार कमी करण्यासाठी श्री अंबाबाई भक्त मंडळाने पुढाकार घेतला आहे. मंडळाने आपला 4 हजार स्केअर फुटचा हॉल गरजू कुटुंबाला विवाहासाठी मोफत देण्याचे ठरवले आहे. शिवाय मर्यादीत व्हराडीसाठी जेवणही मोफत दिले जाणार आहे.
मंडळाच्या हॉलचा लाभ घेण्यासाठी गरीब कुटुंबीयांनी ताराबाई रोड, मित्र प्रेम मंडळाजवळील अंबाबाई भक्त मंडळाच्या हॉलशी संपर्क साधावा लागणार आहे. गेल्या पाच वर्षांपासून मंडळाकडून मोफत प्रसादालय सुरु आहे. येथे करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनास येणाऱया परगावच्या भाविकांना रोज पोटभर जेवण भरवले जात आहे. लोकसभागातून शिधा आणि देणगी मिळत असल्याने भाविकांना जेवण देण्याच्या कार्यालयात खंड पडलेला नाही, ही प्रसादालयाची जमेची बाजू आहे. आता अंबाबाई मंडळाने गरीब घरातील मुलगा, मुलगीच्या विवाहासाठी माता-पित्यांना कराव्या लागणाऱया खर्चात मोठी बचत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
गेल्या महिन्याभरातून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी केलेले निर्बंध शासनाने शिथिल केल्याने विवाह थाटात लावून देण्याची चर्चा रंगू लागली आहे. शिवाय एप्रिलपासून मे अखेरपर्यंत तब्बल 42 मुहूर्त आहेत. हे मुहूर्त निश्चित करुन वधू-वरांच्या घरी लगीनघाई सुरु होईल. अशा काळातच अंबाबाई मंडळाने घरची बेताची परिस्थिती आणि महागाईमुळे मुलांच्या विवाहासाठी पैसे खर्च करु शकत नाहीत, अशा माता-पित्यांसाठी मंडळाने आपला हॉल मोफत देण्याचा घेतलेला निर्णय सामाजिक भान दाखवून देत आहे. सर्व जाती-धर्मातील कुटुंबीयांना आपल्या मुलांच्या विवाहासाठी हॉल बुक करता येणार आहे. या हॉलमध्ये रोज दुपारी साडे बारापर्यंत आणि दुपारी 4 नंतर विवाह सोहळा करता येईल. विवाहानंतर वधु-वरांच्या मर्यादीत व्हराडी मंडळींना मोफत जेवणही दिले जाणार आहे. मधल्या तीन तासांच्या वेळेत परगावच्या भाविकांसाठी मोफत प्रसादालयही सुरु राहणार आहे. गरीब कुटुंबातील मुलांचा विवाह सोहळा मंडळाच्या हॉलमध्ये झाल्यास मंगल कार्यालय आणि जेवणावर खर्ची पडणाऱया हजारो रुपयांच्या बचत होणार आहे.
विवाहासाठी धान्य, देणगी स्वरुपात मदत द्या
गरीब कुटुंबाचा डोलारा दैनंदिन मिळकतीवर अवलंबून असतो. अनेक कुटंबातील महिला धुणी-भांडी करुन घरसंसार चालवत असतात. पुरुष मंडळीही गवंडी, सेंट्रींग कामासह फेरीवाले होऊन घरात पैसे आणत असतात. अशा पालकांना मुला-मुलींच्या विवाहासाठी श्रीमंत, सामान्य कुटुंबातील विवाहप्रमाणे स्वादिष्ट करता येत नाही. तेव्हा दानशुर संस्था, व्यक्तींनी धान्य, देणगी स्वरुपात अंबाबाई भक्त मंडळाकडे मदत दिल्यास त्यातून विवाहावेळी स्वादिष्ट जेवणाची सोय करता येणार आहे.
संजय साळोखे (अध्यक्ष-श्री अंबाबाई भक्त मंडळ)