जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांकडून मंदिराची आज पाहणी
प्रतिनिधी/कोल्हापूर
नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दिवसापासून करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराचे दार भाविकांना दर्शनासाठी खुले केले जाणार असल्याने मंदिर व परिसराच्या सुरक्षेसाठी जूना राजवाडा पोलीस ठाण्याने चोख नियोजन केले आहे. तब्बल 300 पोलीसांचा फौजफाटा मंदिराच्या सुरक्षेसाठी तैनात केला जाणार आहे. यासंदर्भात पोलीस अधीक्षक अधीक्षक शैलेश बलवकडे यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला आहे. शनिवारी जिल्हाधिकारी राहूल रेखावार व पोलीस अधीक्षक बलकवडे हे मंदिर व परिसराची पाहणी सुरक्षेबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी सांगितले.
दरम्यान, मंदिराच्या अंतर्गत सुरक्षेसाठी देवस्थान समितीने 45 सुरक्षा रक्षक नेमले होते. गेल्या काही वर्षांपासून हेच रक्षक मंदिर सुरक्षेचे काम करताहेत. मात्र कोरोनामुळे अंबाबाई मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवले असूनही 45 सुरक्षा रक्षक मंदिरात तैनात असणे हे चुकीचे आहे, असे सांगत देवस्थान समितीचे प्रशासक तथा जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी 36 रक्षकांची सेवा थांबवून फक्त 9 रक्षक मंदिरात तैनात ठेवले आहेत. सध्या याच रक्षकांच्या जोरावर मंदिराची सुरक्षा सुरु आहे. सध्याचे चित्र असे असले तरी नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दिवसापासून सेवा थांबललेल्या 36 रक्षकांना पून्हा मंदिर सुरक्षेच्या सेवेत दाखल करुन घेतले जाणार असल्याचे देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी सांगितले. तसेच उत्सव काळात अंबाबाई मंदिराची सुरक्षा आणि दर्शनाच्यानिमित्ताने होणाऱया गर्दीवर वॉच ठेवण्यासाठी 300 पोलीसांचा फौजफाटा मिळावा, अशी मागणी पोलीस अधीक्षकांकडे केली असल्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी सांगितले.
मंदिर व परिसरात असा असेल पोलीस बंदोबस्त
2 पोलीस निरीक्षक
7 पीएसआय
172 पोलीस (55 महिला व 122 पुरुष)
150 होमगार्ड